वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या “तांडव’ या वेब सिरीजचा डायरेक्टर अली अब्बास जाफरने ट्विटरवर माफी मागून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. “तांडव’ या वेबसिरीजमध्ये दाखवलेली कथा आणि प्रत्यक्षातील घटना यामधील साधर्म्य हा केवळ एक योगायोग आहे. या वेबसिरीजमधील कलाकार आणि निर्मात्यांना कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही. तसेच धर्म, जात, समुदाय, वंश किंवा भावनांचा अनादर करण्याचाही आपला हेतू नाही.
“तांडव’ या वेबसिरीजमधून जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आपण बिनशर्त माफी मागायला तयार असल्याचे अली अब्बास जाफरने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. “तांडव’ वेबसिरीजचा पहिला एपिसोड लॉन्च झाल्यावर लगेच त्याच्याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागली होती. सोशल मीडियावर देखील “हॅशटॅग बॅन तांडव’ हे अभियान सुरू झाले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर ही दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. “तांडव’ च्या निर्मात्यांच्या विरोधात उत्तर प्रदेशात “एफआयआर’देखील दाखल करण्यात आली आहे. भगवान शंकराचा अवमान या वेब सिरीज मधून केल्याचा आरोप या “एफआयआर’मध्ये केला गेला आहे.