रवींद्र कदम
मतदारसंघात विकासाचा डांगोरा पिटणारे विद्यमान आमदार पुन्हा मतदारांच्या दारात
नगर – लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक आली की लोकप्रतिनिधी विकासकामांची टिमकी बजावत मते मागत गावोगावी फिरतात. या पाच वर्षांत आम्ही एवढा निधी दिला, एवढी विकासकामे केली. गावच्या विकासासाठी आमचे एवढे योगदान असल्याचे सांगतात. मात्र, जिल्ह्यातील बाराही आमदारांची दत्तक गावे आज विकासापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे इतर गावांची काय स्थिती, हे लक्षात येते. असे असूनही पुन्हा हेच आमदार आता विकासाचा डांगोरा पिटत मतदारांच्या दारात मताचे दान मागण्यासाठी हात जोडून उभे असल्याचे चित्र दिसत आहे.
महात्मा गांधींच्या विचारधारेतून मिळालेल्या प्रेरणेने त्यांना अपेक्षित असलेले आदर्श गाव साकारण्यासाठी केंद्र शासनाने आदर्श सांसद ग्राम योजना सुरू केली. त्याच धर्तीवर विधानसभा सदस्य आणि विधानपरिषद सदस्य यांनी निवडलेल्या गावांत आमदार आदर्श ग्राम योजना योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गावच्या सर्वांगीण विकासाठी जिल्ह्यातील 12 आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील एक-एक गाव मोठ्या हिरीरिने निवडले. परंतु हे दत्तक गाव कागदारवरच असून, विकासाच्या प्रतीक्षेत राहिले.
गावचा स्थानिक विकास करून आदर्श गाव घडविणे हे योजनेचे धेय्य होते. मात्र तसे घडले नाही. तसेच या गावांचा विकास झाल्यास परिसरातील गावांना प्रेरणा मिळू शकेल, असा त्यामागील उद्देश होता. तसेच गावात आर्थिक व सामाजिक न्याय, श्रमाची प्रतिष्ठा, स्वच्छता, पर्यावरण संतुलन, सार्वजनिक जीवनातील पारदर्शकता, नागरिकांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी अशा गावांची निवड करण्यात आली. मात्र या गावांकडे लोकप्रतिनिधी फिरकले का? या बारा गांवांपैकी किती गावे आदर्श झाली, असा ही प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
या गावामध्ये शासकीय निमशासकीय लोककल्याणाच्या योजना राबविणे. तसेच विविध शिबिरे राबवून गावचा विकास करण्याचा मानस आमदारांनी घेतला होता. गावात शाळा, रस्ता, दवाखाने, मूलभूत सुविधा उपलब्धकरून करून गाव सुजलाम सुफलाम बनवण्याचे काम आमदारांनी करायचे होते. या गावांचा आदर्श इतर गावांनी घ्यायचा होता. परंतु झाले उलटेच ह्या गावांना आदर्श बणविण्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे इतर गावांनी विकासाची आशा सोडली आहे. आता पुन्हा हेच विद्यमान आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यामुळे पुन्हा पाच वर्ष या गावांचा विकास शोधण्यास अवघड जाणार नाही. त्यासाठी हे उमेदवार पुन्हा मतदारांच्या दारात विकासाचा डांगोरा पिटवत उभे आहेत.
आमदारांनी घेतलेली दत्तक गावे
शिवाजी कर्डिले : (राहुरी-नगर)- दगडवाडी
वैभव पिचड : (अकोले)- पैठण
बाळासाहेब थोरात : (संगमनेर)-रखशिंदे
राधाकृष्ण विखे : (शिर्डी) – कोल्हार
स्नेहलता कोल्हे : (कोपरगाव)-ओगदी
भाऊसाहेब कांबळे : (श्रीरामपूर)-भामाठाणा
बाळासाहेब मुरकुटे : (नेवासा)-बहिरवाडी
मोनिका राजाळे : (शेवगाव)-ढवळेवाडी
विजय औटी : (पारनेर)-कर्जुले हर्या
संग्राम जगताप : (नगर)- बुरडगाव
राहुल जगताप : (श्रीगोंदा)-वाळकी
प्रा. राम शिंदे : (कर्जत/ जामखेड)-मोहा
विधान परिषद सदस्य
आमदार अरुण जगताप : तरडगांव (श्रीगोंदा)
सुधीर तांबे : पारेगांव (संगमनेर)