समस्तीपूर, (बिहार) – राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही लोकशाही मार्गाने कुटुंब व्यवस्थेच्या आघाडीविरोधात लढा देत आहे, अशा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील दुसऱ्या प्रचारसभेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. एकाबाजूला “एनडीए’ लोकशाहीशी बांधील आहे, तर दुसरीकडे घराणेशाहीद्वारे चालवल्या जाणारे राजकीय पक्ष आहेत, असेही ते म्हणाले.
बिहारची पवित्र भूमी जगाला लोकशाहीचे धडे शिकवत आली आहे. इथूनच लोकशाहीची बीजे रुजली आहेत. “एनडीए’ सरकार हे “सब का साथ, सब का विकास’साठी कार्यरत आहे. मात्र घराणेशाहीद्वारे चालवल्या जाणाऱ्या राजकीय पक्षांनी लोकांना काय दिले ? या घराण्यांनी केवळ स्वतःसाठी मोठी घरे बांधली. स्वतःसाठी आलिशान कार खरेदी केल्या.
आपल्याच कुटुंबातील व्यक्तींना निवडणुकीची तिकीटे दिली गेली. मात्र नितीश कुमार यांचा एक तरी नातेवाईक राज्यसभेमध्ये पोहोचला आहे का ? जे लोक लोकशाहीसाठी काम करतात, ते जनतेसाठी काम करतात, असे पंतप्रधान म्हणाले.
विरोधकांपैकी कोणाचेही नाव न घेता पंतप्रधानांनी विरोधकांना “जंगलराजचे युवराज’ म्हणूनही संबोधले. प्रामुख्याने कॉंग्रेस पक्षावर टीका करताना हा पक्ष केवळ एका कुटुंबापुरताच मर्यादित राहिला असल्याचे मोदी म्हणाले. सरदार पटेल हे कॉंग्रेसचे नेते नव्हते का ? मात्र तरीही त्यांच्या जयंतीला त्यांचे स्मरण करण्यास कॉंग्रेसला अडचण वाटते, अशी टीकाही त्यांनी केली.
बिहारमधील विधानसभा निवडणुकीतील 71 जागांसाठी 28 ऑक्टोबरला मतदान झाले. तर उर्वरित 172 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 94 जागांसाठी 3 नोव्हेंबर रोजी आणि उर्वरित जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.