मसूर – चिखली, ता. कराड येथील माजी सरपंच अजितराव पाटील यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत मनमानी व बेकायदेशीर कारभार करून गावातील सार्वभौमत्व नष्ट करण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी महेश धर्मेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली असून तशा आशयाचे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बंडोजी सावंत, सुवर्णा गावडे, बाबुराव बुरूंगले, अरुण माने, कुलदीप क्षीरसागर, महादेव बुरूंगले, सुहास क्षीरसागर, उमेश जाधव, संतोष खापे यांची उपस्थिती होती.
पाटील पुढे म्हणाले, चिखली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कार्यरत असताना अजितराव पाटील यांनी अनेक बेकायदेशीर कारभार व मनमानी केली आहे. गावातील मारुती मंदिर, जोतिर्लिंग मंदिर, विठ्ठल मंदिर त्यांनी पाडले. ग्रामपंचायतीच्या मालकीचे व्यावसायिक गाळे पाडले. कोणत्याही कायदेशीर तरतुदीशिवाय ग्रामपंचायत कार्यालय पाडले. जोतिबा मंदिर पाडले तसेच ग्रामपंचायतीच्या मालकीच्या इमारती शासकीय परवानगी न घेता पाडलेल्या आहेत.
सदर मनमानी कारभार करताना अजितराव पाटील यांनी शासकीय पूर्व परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. गावातील मंदिरे व ग्रामपंचायतीला भाडे मिळवून देणारे व्यावसायिक गाळेहे पाडले आहेत. याप्रकरणी कोणतिही कायदेशीर प्रक्रिया करण्यात आलेली नाही. अशा मनमानी कारभार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच त्यांचे ग्रामपंचायत सदस्यपद रद्द करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.