नगर – प्रत्येक व्यक्ती आपल्या इष्ट देवताला प्रसन्न करण्यासाठी, सुख-समृद्धीसह श्रद्धेपोटी देवपूजा करून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. मात्र आता करोना व्हायरसला दूर ठेवण्यासाठी कापूरचा उपयोग होत असल्याने लोकांकडून खरेदी वाढली आहे. कापराच्या उपयोगाची माहिती सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. दुकानदारही मागणीनुसार भाव वाढवून नफा कमवीत आहेत.
कापराच्या सुगंधाने जीवाणू, विषाणू, लहान कीटक नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर राहतात, असे वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे. याशिवाय कापराच्या सुगंधाने मनात एक नवचैतन्य निर्माण होते.
सर्दी-पडसे व्हायची लक्षणे असताना रुमालात 3-4 कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दी-पडसे होत नाही, असे आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार करोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून लोकांनी कापराचा उपयोग करणे सुरू केले आहे. तसेच कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते.
खोकल्याकरिता आयुर्वेदिक कंपन्या कापराचा उपयोग करतात. त्यामुळे कापूर संरक्षणकर्ता असल्याचा समज लोकांमध्ये आहे. भारतीय मानसिकतेनुसार लोकांची खरेदी वाढली आहे. अनेकजण कापूर रुमालात ठेवून प्रतिबंधक उपाय म्हणून गर्दीच्या ठिकाणी सुगंध घेत आहेत. याच कारणामुळे विक्री वाढली आहे. कापरचा सीझन जून-जुलैपासून दिवाळीपर्यंत असतो.
तेव्हा भाव कमी-जास्त होत असतात. पण आता करोना व्हायरसमुळे बाजारपेठेत मागणी असल्याने भाव वाढले आहेत. किरकोळमध्ये दीडपट भावात नेहमीच विक्री होते. कदाचित मागणीमुळे दुकानदार डबीवरील प्रिंटिंगच्या भावात अथवा जास्त भावात विक्री करीत असेल, पण त्याची अधिकृत माहिती नाही. पूर्वी चिकनगुनिया आजारात डासांचा प्रार्दुभाव थांबविण्यासाठी लोकांनी कापराचा उपयोग जास्त प्रमाणात केला होता. कापूर उद्योगाचा लघु उद्योगात समावेश होतो. आता प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुका स्तरावरही उत्पादक वाढले आहे.