- चार दिवसांनंतर मिळतोय अहवाल – मनुष्यबळाअभावी तारांबळ
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करोनासदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. संपर्कात आलेल्या तसेच लक्षणे असलेल्या रुग्णांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात येते. ती निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा घशातील द्रावाचे नमूने घेत त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. मात्र या चाचणीच्या अहवालासाठी नागरिकांना चार दिवसांपेक्षा जास्त दिवस वाट बघावी लागत आहे. हा उशीरच करोना बाधितांची संख्या वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे समोर येत आहे.
महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये व मनपाच्या दवाखान्यांमध्ये संशयित रुग्णांचे स्वॅब घेतले जातात. ते स्वॅब चाचणीसाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठविले जातात. त्या नमुन्यांचा तपासणी अहवाल तात्काळ मिळणे अपेक्षित आहे. मात्र बहुतांश वेळा चार दिवस अहवाल प्राप्त होत नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वायसीएम रुग्णालयामध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे.
तसेच वेबसाइटच्या नेटवर्कचीही अडचण असल्याने अहवाल अपडेट करण्यात अडचणी येत आहेत. शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 91 हजारांच्या पुढे गेली आहे. दिवाळीनंतर शहरातील दररोजची बाधित येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. सद्यस्थितीत दररोज शहरातील 4 ते 5 हजार संशयित नागरिकांची रॅपिड अँटीजेन तर काही जणांची आरटीपीसीआर चाचणी केली जाते. त्यापैकी आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालासाठी वेटिंगला असलेल्या रुग्णांची संख्या 1000 ते 1200 पर्यंत पोहोचली आहे.
दिवाळीनंतर स्वॅब चाचणीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे. चाचणीचा अहवाल आल्यानंतर संगणकामध्ये अपडेट करायला लागतो. तो अपडेट करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. मध्यंतरी अडचणी आल्यामुळे काही अहवाल प्रलंबित होते. सध्या आपली पाचशे चाचण्या करण्याची क्षमता आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम.