मुंबई -हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलीवूडचे चुकीचे आणि बदनामीकारक चित्र रंगवले जात असल्याकडे लक्ष वेधणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहेत.
त्याबाबतची माहिती राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतल्यानंतर दिली. क्रुझ ड्रग्ज प्रकरणावरून एनसीबीच्या रडारवर बॉलीवूडमधील कलाकार आले आहेत. त्या प्रकरणी होत असलेल्या कारवाईमुळे बॉलीवूडचे नकारात्मक चित्र उभे राहत असल्याबद्दल त्या भेटींमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. बॉलीवूड हा मोठा उद्योग आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. त्यांचे उपजीविकेचे साधन धोक्यात येऊ शकते. त्या बाबींचा विचार करून मुख्यमंत्री पत्र पाठवणार आहेत, असे मलिक यांनी नमूद केले.