चर्चा न करता कशा पद्धतीने घेता येतील, यावर विचार व्हावा
शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली अपेक्षा
पुणे – विद्यापीठ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अतिशय योग्य आहे. आता परीक्षेवरून अन्य चर्चा न करता त्या कशा पद्धतीने घेता येतील, यादृष्टीने विचार व्हायला हवा. शासन, विद्यापीठ, संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक या सर्व घटकांनी एकत्र येत परीक्षा लवकरात लवकर व्हावी, अशी अपेक्षा शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली.
विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ यांच्या निर्देशानुसार परीक्षा घेण्याची तयारी आहे. सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे. आता जास्त कालावधी न घेता राज्य सरकारने परीक्षा कधी घ्यायचा, याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, हीच अपेक्षा.
– ऍड. एस. के. जैन, अध्यक्ष “शिप्रमं’च्या नियामक मंडळ
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विद्यार्थी हिताचा आहे. तो विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहे. परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या पदवीला आता किंमत राहील. पूर्वीपासून पदवी परीक्षा व्हायला हवी, ही मागणी होती. आता परीक्षा लवकरच घेणे आवश्यक आहे.
– डॉ. गजानन एकबोटे, कार्याध्यक्ष, प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटी
परीक्षेशिवाय पदवी देणे अशैक्षणिक ठरले असते, ही आमची भूमिका होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परीक्षा घ्यायलाच हवी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने अशैक्षणिक निर्णयाचा पराभव झाला. या निर्णयाने परीक्षांचे राजकारण करणाऱ्यांचाही पराभव झाला आहे.
– धनंजय कुलकर्णी, याचिकाकर्ते
कोण जिंकल, कोण हरल याची चर्चा करण्यापेक्षा परीक्षांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता शासनाने विद्यापीठांशी चर्चा करून परीक्षांबाबत निर्णय घ्यावा. आम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यास तयार आहोत. एकमेकांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा घेता येतील.
– डॉ. शरद कुंटे, अध्यक्ष, डेक्कन एज्युकेशन सोसायटी
या निकालाचे स्वागत आहे. परीक्षेला न बसता पदवी देणे हे अजिबात योग्य नव्हते. नवीन पिढीचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले आहे. या विद्यार्थ्यांवर कोविड बॅच म्हणून शिक्का बसला असता. परीक्षा पुढे ढकलल्या तरी चालतील पण रद्द करू नयेत, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून परीक्षा घेतल्या जातील.
– डॉ. शां. ब. मुजूमदार, संस्थापक, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ