बाजार समितीचे प्रशासक गरड यांची माहिती
पुणे – मार्केट यार्डात केवळ फळ बाजारात विशिष्ट आडत्यांकडेच लिंबु विक्रीचा घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार केला जाणार आहे. शेतकऱ्यांसह आडत्यांचे संघटना असलेल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनशी चर्चा करून निर्णयाचा पुनर्विचार केला जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे नवनिर्वाचित प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.
फळे आणि तरकारी विभागात गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने लिंबू विक्री सुरू आहे. त्यामुळे स्पर्धा होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. फळबाजाराच्या तुलनेत तरकारी विभागात लवकर लिलाव होतात. त्यामुळे लिंबास चांगला भाव मिळतो आणि ग्राहक, खरेदीदारांनाही भाजीपाल्यासह लिंबू वेळेत मिळते. त्यामुळे प्रशासकांच्या निर्णयावर शेतकरी नाराज आहेत.
तरकारी विभागात होणाऱ्या घाऊक लिंबाच्या विक्रीबाबत फळबाजारातील लिंबाच्या व्यापाऱ्यांनी समितीकडे तक्रार केली होती. त्यावर प्रशासक गरड यांनी आडते असोसिएशन अथवा शेतकऱ्यांशी चर्चा न करता यापुढे लिंबाची विक्री केवळ फळविभागात करण्याच्या निर्णयासह ज्या-त्या विभागात संबंधित शेतमालाची विक्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयास कडाडून विरोध झाल्याने यावर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.