मुंबई, दि. 9 – मुंबईतील मनोरा या आमदार निवासाच्या पुनर्रबांधणीचा निर्णय फडणवीस सरकारच्याच काळात झाला आहे. या प्रकल्पाला 900 कोटी रुपये खर्च केला जाणार असल्याची व त्यात भ्रष्टाचार झाल्याची खोटी माहिती देऊन भारतीय जनता पक्षाना पुन्हा बेफाम खोटे आरोप सुरू केले आहेत. या प्रकरणात फडणवीस यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेस पक्षातर्फे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सावंत यांनी म्हटले आहे की, सत्तेच्या हव्यासापोटी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर बेफाम आरोप करणारा भाजप पुन्हा एकदा उघडा पडला आहे. फडणवीस यांच्याच काळात या प्रकल्पाचे काम मोदी सरकारच्या एनबीसीसी कंपनीला दिले. अतुल भातखळकर यांनी या प्रकल्पाचे काम 900 कोटी रुपयांचे कसे झाले याची माहिती न घेताच भ्रष्टाचार झाल्याची खोटी बोंब ठोकली.
एनबीसीसी कंपनीनेच 20 फेब्रुवारी 2020 ला विधीमंडळाला दिलेल्या ई टेंडर नोटीशीत या प्रकल्पाची किंमत 810 कोटी रुपये इतकी सांगितली. नंतर 8 डिसेंबर 2020 मध्ये याच कंपनीने याच प्रकल्पाची किंमत 875 कोटी 65 लाख इतकी वाढवली. या प्रकल्पाच्या कामासाठी फडणवीस यांनी भ्रष्ट कंपनीची नियुक्ती का केली असा सवालही त्यांनी उपस्थित केला.