अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याची गरज
पुणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता बारावीच्या गुणपत्रिकेवरून “अनुत्तीर्ण’चा शेरा हटवून त्यासाठी पुनर्परीक्षेस पात्र असा शेरा नमूद करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यात निश्चितपणे खूप मदत होणार आहे. विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा सकात्मक विचार करून आयुष्यातील यशाकडे वाटचाल करण्याची आवश्यकता आहे, अशा भावना शिक्षक, पालक, मुख्याध्यापक यांच्याकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना स्वत:ची जबाबदारी समजली पाहिजे. अनुर्त्तीणांचा शेरा बदलून मानसिकतेत बदल होणार नाही. अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी कृतियुक्त धोरण राबविण्याची गरज आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून तत्काळ त्यांची फेरपरीक्षा घेण्यात येते. हा शासनाचा चांगला निर्णय आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी हिम्मत शाळांचा उपक्रम राबविला पाहिजे. शाळांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष वर्ग भरविले पाहिजेत.
– अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
बारावीच्या गुणपत्रिकेतील “अनुत्तीर्ण’चा शेरा हटविण्याचा निर्णय चांगला व विद्यार्थी हितासाठी योग्यच आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास केल्यास त्यांच्यावर अनुत्तीर्ण होण्याची वेळच येणार नाही. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवन जगत असताना कौशल्य विकासाचेही गुण आत्मसात करून उपयोगिता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
– महेंद्र दाभाडे, शिक्षक, नारायणराव गेनबा मोझे विद्यालय
काही विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात केवळ नावापुरताच प्रवेश घेतात. ते नियमितपणे कधीच उपस्थित राहात नाहीत. परीक्षांचा अभ्यास करत नाहीत. त्यामुळे ते परीक्षेत अनुत्तीर्ण होतात. नियमित वर्गात हजर राहणारे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असतात ही वस्तुस्थिती आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:ची गुणवत्ता वाढवून उत्तीर्ण होण्याचे ध्येय बाळगलेच पाहिजे. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढणार आहे.
– अविनाश ताकवले, प्राचार्य, पुणे नाईट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय
तांत्रिक बाबीबरोबरच कौशल्य विकासाचे व्यावहारिक पर्याय आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे महत्त्वाचे आहे. या परीक्षा पास होऊ न शकलेल्या मुलांना इतर सन्माननीय रोजगाराचे पर्याय आहेत असा विश्वास पालकांना आणि विद्यार्थ्यांना देणे ही शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी आहे. बारावीनंतर पुढील प्रवेशासाठी अनेकविध प्रवेश परीक्षा होत असल्याने बारावी
परीक्षेचे महत्त्व कमी होत आहे. त्यामुळे बारावी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचाही आत्मविश्वास कमी होत आहे, याचाही विचार करण्याची गरज आहे.
– मुकुंद किर्दत, अध्यक्ष, आप पालक युनियन
बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना समाजात हिणविण्याचे प्रकार घडतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होत जातो. ही गंभीर बाब म्हणावी लागेल. शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला असून यामुळे विद्यार्थ्यांना चांगली प्रेरणा मिळू शकते. अपयशातून यशाकडे वाटचाल करण्यासाठी विद्यार्थ्यांना चालना मिळणार आहे.
– डॉ. गणपत मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, पुणे जिल्हा परिषद
गुणपत्रिकेवरील अनुत्तीर्ण शेरा हटविण्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या कपाळावर अनुत्तीर्णचा शिक्का पुसला जाणार आहे. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यास नक्कीच मदत होणार आहे.
– राजेंद्र धारणकर, अध्यक्ष, सिस्कॉम
या निर्णयामुळे शिक्षण प्रक्रिया खूप सोपी होत असल्याचे वाटते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गांभीर्य राहणार नाही. 10 वी आणि 12 वी सारख्या महत्त्वाच्या वर्षांमध्ये असे झाल्यास, येत्या काही दिवसांमध्ये पदवी मिळवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतील असे वाटत नाही. विद्यार्थी “नापास’ झाल्यास, त्याची समजूत काढावी असे नाही. त्यांना जाणीव होणे आवश्यक आहे. याऐवजी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
– पराग वाघमारे, विद्यार्थी
आताच्या मुलांची मानसिकता पाहता हे योग्य आहे. सगळ्या गोष्टी सकारात्मक करण्याचा प्रयत्न चांगला आहे. याला नक्कीच एक चांगला बदल म्हणता येईल. यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बदलेल. परंतु, विद्यार्थ्यांच्या आजूबाजूचा समाज हा बदल कितपत सहजपणे स्वीकारेल, याबाबत साशंकता आहे.
– लीना घारपुरे, समुपदेशक