नगर – भाजपच्या नगर दक्षिण, नगर उत्तर व नगर शहर या तिन्हीही जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने यांच्यात निवडणूक अधिकारी व विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरीभाऊ बागडे यांच्यासह कोअर कमिटीतील सदस्यांना एकमत करण्यात अपयश आले.
बागडे यांनी स्वतंत्रपणे इच्छुकांच्या मुलाखती घेवून त्यांच्यात एकमत करण्याचा प्रयत्न केला. पण इच्छुक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर या तिन्ही जिल्हाध्यक्षांच्या निवडीचा निर्णय प्रदेशच्या कोर्टात पाठविण्याचे बागडे यांनी जाहिर केले. उद्या जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली जातील असे आ. बागडे यांनी सांगितले.
नव्याने पक्ष संघटनेतील रचनेनुसार आता नगर जिल्ह्यात भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष राहणार आहे. दक्षिण, उत्तर असे दोन ग्रामीण तर नगर शहर अशा तीन जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी आज येथील कोहिनुर मंगल कार्यालयात पक्षाची संघटन पर्व बैठक बोलविण्यात आली होती. निवडणूक अधिकारी म्हणून बागडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक दुपारी 1 वाजता सुरू झाली. यावेळी माजीमंत्री राधाकृष्ण विखे, माजीमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, शिवाजी कर्डिले, विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी, ऍड. अभय आगरकर, पक्राश चित्ते, प्रकाश ढोकरीकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात बेरड यांनी 17 ग्रामीणच्या मंडळ अध्यक्षापैकी 11 मंडळ अध्यक्षांची निवड झाली असून त्यात 9 मंडळ अध्यक्षांची निवड जाहिर करण्यात आल्याचे स्पष्ट केले. आता तीन जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. त्यानुसार बागडे यांच्याकडे निवडणुकीचे सुत्र देण्यात आले. आ. बागडे यांनी निवडीची प्रक्रिया स्पष्ट केली. ते म्हणाले, हे पद शोभेचे नाही तर संघटनेत काम करण्यासाठी आहे. पक्ष निष्ठा, पक्षाच्या कामाला वेळ देणाऱ्यांनी हे पद घ्यावे.
त्यानंतर नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांना इच्छा व्यक्त करण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार 17 जणांनी यापदावर दावा केला. त्यात सुनील पारखे, साहेबराव म्हसे, संतोष लगड, दिलीप भालसिंग, भानुदास बेरड, सुभाष गायकवाड, रवींद्र कडू, अशोक चोरमले, शांतीलाल कोपनर, राहुल कारखिले, विश्वनाथ कोरडे, स्वप्नील देसाई, युवराज पोटे.
नगर उत्तरेसाठी 14 जणांनी इच्छा व्यक्त केली. त्यात शिवाजी धुमाळ, भरत फटांगरे, भानुदास डेरे, हरीभाऊ चकोर, राजेश चौधरी, नितीन जोशी, राजेंद्र गोंदकर, नितीन कापसे, प्रकाश चित्ते, जालिंदर वाकचौरे, शिवाजी गोंदकर, बाळासाहेब मुरकुटे. तर नगर शहरासाठी जगन्नाथ निंबाळकर, सचिन पारखी, दामोदर बठेजा, मनेष साठे, श्याम भिंगारे, सुर्वेंद्र गांधी, बंटी डापसे, भैय्या गंधे यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली.
आ.बागडे यांनी ही निवडी बिनविरोध व्हावी असा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे इच्छुकांनी पक्षशिस्तीचा विचार करून इच्छुकांनी माघार घ्यावी असे आवाहन केले. पण एकानेही माघार घेतली नाही. त्यानंतर बागडे यांनी तीन जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या स्वतंत्र मुलाखती घेतल्या. त्यानंतर या इच्छुकांबरोबर चर्चा करून त्यांच्या एकमताने नाव देण्याची सुचना देखील त्यांनी केली. पण इच्छुक आल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यानंतर बागडे यांनी कोअर समितीच्या सदस्यांची बैठक घेवून त्यांना सर्व वस्तूस्थिती सांगितली.
पदाधिकाऱ्यांवर एक कोटी घेतल्याचा आरोप
संघटन पर्व बैठक सुरू होण्यापूर्वी भगवान हरबा यांनी मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर नगर शहरातील पदाधिकाऱ्याला अडवणून एक कोटी परत दे, अशी मागणी केल्यानंतर काही काळ गोंधळ झाला. त्याने माझे एक कोटी लाटले आहेत. त्याला पैसे द्यायला सांगा असे म्हणून हरबा यांनी कार्यालय डोक्यावर घेतले होते. हरबा यांच्यामुळे कार्यालयात येण्यास या पदाधिकाऱ्यास उशीर झाला. काही कार्यकर्त्यांनी हरबा यांना बाजूला नेवून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वातावरण निवळले.