खा. उदयनराजे भोसले ः चौंडी येथे येऊन अहल्यादेवी होळकर यांना केले अभिवादन
विलीनीकरणाची चर्चा निराधार ः खा. सुळे
शरद पवार आणि राहुल गांधी यांची गुरुवारी दिल्लीत भेट झाली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेस पक्षात विलीन होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर बोलताना त्या म्हणाल्या, याबाबत पवार यांनी स्पष्टीकरण दिलेच आहे. दर 15 दिवसाला शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात भेट होत असते. त्यात नवीन काही नाही. त्यामुळे या चर्चा निराधार असल्याचे सुळे म्हणाल्या.
जामखेड – राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण करायचं झालं, तर कोणाबरोबर करायचा आणि का करायचा, याबाबत चर्चाविनिमय होणं गरजेचं आहे. मला याबाबत काही माहिती नाही. आमच्याशी याबाबत चर्चाही झालेली नाही. याबाबतचा जो निर्णय होईल, तो चर्चा करूनच घेतला जाईल. परस्पर निर्णय घेता येणार नाही, असे ठाम मत खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांच्या 294 जयंतीनिमित्त आज सकाळी 11 वाजता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्मृतीस्तंभास अभिवादन केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर पालकमंत्री ना. राम शिंदे यांनी खा. उदयनराजे भोसले यांना राजमाता अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा देऊन सन्मानित केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा गुंड, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांच्यासह स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये खा. उदयनराजे बोलत होते.
गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात दिल्लीमध्ये चर्चा झाली. या चर्चेचे वृत्त बाहेर आले, तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भात चर्चा झाल्याची चर्चा पिकली होती. या चर्चेबाबत जेव्हा खा. भोसले यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी विलीनीकरणाबाबतचा निर्णय परस्पर घेता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात नवख्या खासदार हेमा मालिनी यांना पहिल्या रांगेत स्थान दिले जाते. मात्र, शरद पवार यांच्यासारख्या 50 वर्षे देशाची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ नेत्याला मागच्या रांगेत बसविले जाते, हे दुर्दैवी आहे. शरद पवारांबद्दल बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिल्ली येथे 57 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक पक्षांचे ज्येष्ठ नेते यांना बोलावण्यात आले. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही बोलावले होते. त्यानुसार पवार शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मात्र, भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत त्यांना मागच्या रांगेत बसविले. पवारांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यांची जागा न बदलल्याने त्यांनी शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली. त्याच पार्श्वभूमीवर आज सुप्रिया यांनी नाराजी व्यक्त केली.