मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव आणि वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊनचे सावट गडद झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. दरम्यान राज्य सरकारने गेल्या आठवड्यात कडक निर्बंध जाहीर केले होते. ज्यात वीकेंड लॉकडाऊन, रात्रीचा कर्फ्यू आणि दिवसा जमावबंदी यांसारख्या आदेशांचा समावेश होता. पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध 30 एप्रिलपर्यंत सुरू राहतील.
14 एप्रिलनंतरच्या कॅबिनेटमध्ये लॉकडाऊनचा निर्णय होणार आहे, अशी माहिती टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुख्यमंत्रीच लॉकडाऊनची घोषणा करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या ऑनलाईन बैठकीत लॉकडाऊन लागू करण्यासह विविध विषयांवर चर्चा झाली.
या बैठकीत लॉकडाऊनला कसं सामोर जायचं, याबाबत चर्चा झाली. राज्यात लॉकडाऊन लावायचा झाला तर प्रत्येक विभागाची तयारी, पुढील गणितं आणि आर्थिक बाजूची माहिती घेणार, टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनची दाहकता किती ठेवायची? यावर चर्चा झाली. रुग्णसंख्या जिकडे जास्त असेल तिकडे कडक लॉकडाऊन गरजेचं, जास्त कडक लॉकडाऊन लावलं तर सामान्य जनतेचे हालही नाही झाले पाहिजे यावर चर्चा झाली. लॉकडाऊन करायचं तर किती दिवसाचं करायचं? राज्यातली आरोग्य यंत्रणा आणि कर्मचारी याचं नियोजन किती पटीनं आणि कसं वाढवले गेले पाहिजे? यावरही बैठकीत चर्चा झाली.