- एका दिवसात 17 मृत्यू होऊनही पालिकेने दाखवले 11
- प्रशासनाची फ्रॉडगिरी कशासाठी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये करोनाने आज आणखी एक नवीन उच्चांक गाठला. आज दिवसभरात सर्वाधिक 17 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. महापालिका प्रशासनाचे करोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीमध्ये लपवाछपवी करणे सर्वश्रुत आहे. असे असताना प्रशासन आता मृतांच्या आकडेवारीतही बनवाबनवी करत आहे. आज दिवसभरात 17 मृत्यू होऊनही महापालिका प्रशासनाने फक्त 11 मृत्यू दाखवले आहेत. उर्वरित मृत्यू लपवत प्रशासन अशी फ्रॉडगिरी का करत आहे हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
शहरात सोमवारी दिवसभरात 379 नवीन रुग्णांची नोंद झाली.
त्यामध्ये शहरातील 361 रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर शहराबाहेरील 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील आजपर्यंत बाधित रुग्णांची संख्या 7637 इतकी झाली आहे. तर 286 रुग्णांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या 4598 इतकी झाली आहे. तर 2340 रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान आज दिवसभरात 17 रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र पालिकेने केवळ 11 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल दिला आहे. आज मृत झालेले रुग्ण भाटनगर, इंदिरानगर, आकुर्डी, मिलिंदनगर, यमुनानगर, भोसरी, पिंपरी, पिंपरीगाव, निगडी या परिसरातील आहेत. तर शहराबाहेरील चाकण, खडकी बाजार येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. महापालिकेच्या डॅशबोर्ड आणि प्रसिद्धीपत्रकात नेहमीच मोठा फरक असतो.
तर डॅशबोर्डवर मृत्यू म्हणून दाखविण्यात आलेली संख्या काही तासांनंतर पुन्हा कमी होण्याचा प्रतापही येथे घडतो. यावर अतिरिक्त आयुक्तांनी ढोबळ मनाने अंदाज बांधला की, मृत्यू झालेल्या व्यक्तीची माहिती अपलोड केली जाते. नंतर पुन्हा माहिती मिळाल्यानंतर समजते की तो व्यक्ती बाहेरचा आहे. त्यामुळे ती संख्या कमी केली जाते.
मात्र दररोज अशी चूक कर्मचाऱ्यांकडून कशी होऊ शकते हा प्रश्न आहे. जर होत असेल तर तेथील कर्मचारी बदलण्याची तसदी का घेतली जात नाही. प्रशासन जाणूनबुजून मृतांची संख्या कमी दाखविण्याचा प्रयत्न करते. मात्र करोनाचा एवढा उद्रेक होत असताना अशाप्रकारे फ्रॉडगिरी करून काय साध्य होणार?
राज्य शासनाचीही लपवाछपवी
महापालिका प्रशासन आकडेवारी लपवित असताना तिकडे राज्य शासनही लपवाछपवी करत आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये रुग्णसंख्या 7637 झाली आहे, मात्र राज्य शासनाने 6448 इतकी आकडेवारी दाखविली आहे. तसेच मृतांमध्येही बनवाबनवी केली आहे. शहरात आजपर्यंत 163 मृत्यू झाले आहेत. असे असताना राज्य सरकारने केवळ 118 मृत्यू झाल्याचे दाखवले आहे. म्हणजेच सरकारने तब्बल 45 मृत्यू दडवले आहेत.
उशिरा आलेली माहिती अपलोड केली जाते. काही मृत्यू यापूर्वीच झाले आहेत, मात्र माहिती आज मिळाली असल्याने डॅशबोर्डवर ती संख्या दिसत आहेत. बाहेर मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती लवकर मिळत नसल्याने असे होत आहे.
– संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त.