वर्धा – पावसामुळे घराची भिंत कोसळल्याने पती-पत्नीचा झोपेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आर्वी तालुक्यातील दहेगाव (गोंडी) येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. रामकृष्ण महादेव चौधरी (वय.45) व ज्योती रामकृष्ण चौधरी (वय.40) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. तर मुलगा आदित्य रामकृष्ण चौधरी (वय 15) हा जखमी झाला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे. अनेक भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे वर्धा-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील उर्ध्व वर्धा सिंबोरा प्रकल्पात 94.69 टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे 13 पैकी 7 दरवाजे 50 से.मी.ने उघडण्यात आले आहेत. वर्धा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे वर्धा जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीकाठच्या शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले तर घरांचीही पडझड झाली आहे. वर्धा नदी ओसंडून वाहत असल्याने आर्वी-अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.