भाजपची भूमिका स्वीकारल्याने प्रवेशाचा मुद्दाच नाही
संगमनेर – लोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे युतीचा प्रचार केला आहे. भाजप प्रवेश हा मुद्दा आज राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेचं समर्थन करीत त्यांच्या विचारांची भूमिका घेऊन माझी वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट मत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री बोलावतील त्या दिवशी मी तयार राहील, असेही ते म्हणाले.
संगमनेर येथे एका खाजगी कार्यक्रमासाठी माजी मंत्री विखे आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप प्रवेश औपचारिकता राहिली असल्याचं स्पष्ट केलं. मंत्रिपदाबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस कधी आणि मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. ज्या दिवशी मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार असल्याचंही राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळी सांगितले.
कॉंग्रेसबाबत विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणारे अनेक नेते कॉंग्रेसमध्ये आहेत. या नेत्यांनी आता स्वतःहून बाजूला होऊन नव्यांना संधी देण्याची आवश्यकता असल्याची टीका अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता केली. कॉंग्रेसच्या अधोगतीबाबत चिंतन करण्याचा कॉंग्रेसचा विषय संपला आहे, असा टोलाही यावेळी विखे यांनी लगावला. राधाकृष्ण विखे पाटलांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या विरोधीपक्षपदाचा राजीनामा देऊन नंतर आमदारकीचाही राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. कॉंग्रेसने माझी कोंडी केली असून, आता पक्षात माझी घुसमट होत असल्याचं त्यावेळी त्यांनी बोलून दाखवलं होतं. कॉंग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, राधाकृष्ण विखे पाटलांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.