23 धरणांत फक्त 43 टीएमसी पाणीसाठा शिल्लक
पाणी नियोजन करताना जलसंपदा विभागाची कसोटी
पुणे – जिल्ह्यातील 23 धरणांत एकूण सुमारे 43 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी ग्रामीण भागातून होत आहे. तसेच शहरी भागातही पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे पुढील तीन महिने उपलब्ध असलेले पाणी नियोजन काटेकोरपणे करण्यासाठी जलसंपदा विभागाची कसोटी लागत आहे.
यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झाले. त्यानंतर दोन महिने पावसाने चांगली हजेरी लावल्याने जिल्ह्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली. त्यामुळे जिल्ह्यातील भिमा खोऱ्यातील धरणातील पाणी नदीतून खाली सोडण्यात आले. खडकवासला प्रकल्पातील धरणेही पूर्ण भरली. खडकवासला धरणातून सुमारे 19 टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले. हे पाणी पुढे उजनी धरणात पोहचते.
त्यानंतर मात्र परतीच्या पावसाने निराशा केली. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पाऊस न झाल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे पाणीसाठा स्थिर राहिला. यंदा शासनाने जिल्ह्यातील 13 पैकी 10 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांतून शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी आत्ताच होत आहे. काही धरणातील कालव्यातून तसेच नदीपात्रातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. आता विविध भागातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी होत आहे. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन जबाबदारी जलसंपदा विभागाच्या खांद्यावर आली आहे.
खडकवासला धरणसाखळी 31 टक्क्यांवर
पुणे शहराला खडकवासला प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या तीन धरणांमध्ये अवघा 9.29 टीएमसी म्हणजे 31.88 टक्के इतका पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी खडकवासला प्रकल्पात 12.46 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. दरम्यान, दोन आठवडयापूर्वी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत उपलब्ध पाणीसाठयाचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार, हा पाणीसाठा 15 जुलै पर्यंत नियोजन करण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही वर्षात जून आणि जुलै कोरडा जाऊन ऑगस्टमध्ये धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरूवात होते. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागाच्या पाण्याच्या नियोजनाची कसरत यंदाही जलसंपदा विभागाला करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.