खडकवासला प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा
दरवर्षी पाण्यावरून राजकारण आणि ग्रामीण-शहरी वाद
पुढील वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटली
पुणे – “नेमेची येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दरवर्षी पाण्यावरून राजकारण रंगते. पाण्यावरून ग्रामीण व शहरी असा वाद निर्माण होतो. यंदा मात्र पावसाने साथ दिल्याने जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणे भरली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पुढील वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटली असली तर उपलब्ध पाणीसाठ्याचे आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे.
शासनाने पाण्याचे प्राधान्यक्रम ठरविले आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्याला पहिले प्राधान्य आहे. त्यानंतर शेती आणि उद्योग असा प्राधान्यक्रम आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणी पुणे शहराला पिण्यासाठी वापरले जाते. तसेच हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती या तालुक्यांसाठी पिण्यासाठी आणि शेतीसाठी सोडण्यात येते.
शहराला पिण्यासाठी आवश्यक पाणी, शेतीसाठी आवर्तने, बाष्पीभवन, काही ग्रामपंचायती आदींचा विचार करून पाण्याचे नियोजन आतापासून करण्याची गरज आहे. मागील काही वर्षांपासून पावसाचे आगमन उशिरा होत होते. यंदा वेळेवर हजरी लावली. त्यानंतर मात्र जून, जुलै महिन्यात विश्रांती घेतली. ऑगस्ट महिन्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. त्यामुळे धरणे भरली. पाऊस लांबणीवर जात असल्याने जून-जुलै महिन्यातही पाणी कपातीची टांगती तलवार कायम राहते.
दि. 15 ऑक्टोबरला धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा विचारात घेऊन पिण्यासाठी आणि शेतीसाठी नियोजन करण्यात येते. कालवा समिती बैठकीत पुढील वर्षीच्या दि. 15 जुलैपर्यंतच पाणी वाटपाचे नियोजन होते. ग्रामीण भागाला पाणी सोडले तर शहराचे पळविले असा आरोप होतो.
शेती आणि पिण्यासाठी हक्काचे पाणी मिळावे, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून होते. बैठकीमध्ये पाणीवाटपावरून दरवर्षी ग्रामीण आणि शहरी असा वाद रंगतो. सद्य:स्थितीत खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला ही चार धरणे मिळून एकूण 28.91 टीएमसी पाणीसाठा आहे. शहरासाठी पाण्याची एकूण आवश्यकता, शेतीसाठी लागणारे पाणी, किती आवर्तने सोडायची, पाण्याचे होणारे बाष्पीभवन, ग्रामपंचायत यांना लागणारे पाणी आदींच्या मागण्यांचा विचार करून नियोजन केले जाते.