30 एमएलडी अतिरिक्त पाणी मिळेपर्यंत दिवसाआड पुरवठा
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. धरण भरल्यानंतर दररोज पाणीपुरवठा होईल अशी अपेक्षा शहरवासियांची होती. 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड सुरु असलेली पाणी कपात यापुढेही कायम राहणार आहे. जोपर्यंत 30 एमएलडी अतिरिक्त पाणी मिळत नाही. तोपर्यंत एकदिवसाआड पाणीकपात कायम राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गेल्या नऊ महिन्यांमध्ये पाणी गळती रोखणे प्रशासनाला शक्य न झाल्याने आता प्रशासन अतिरिक्त पाणी मिळण्याची वाट पाहत बसले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासह मावळवासीयांनाही पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागील नऊ महिन्यांपासून शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत 25 नोव्हेंबर 2019 पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्यांनतर तो कायम ठेवण्यात आला आहे.
महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी कपात करत असल्याचे सांगण्यात आले होते. शहरामध्ये जलशुद्धीकरण केंद्रापासून जवळ असलेल्या भागामध्ये जास्त प्रमाणात पाणीपुरवठा होतो. तर त्याठिकाणापासून लांब असलेल्या भागातील नागरिकांना कमी प्रमाणात पाणी मिळते. शहरातील सर्वच भागातील नागरिकांना समप्रमणात पाणी मिळण्यासाठी प्रशासनाने कपात करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गेल्या नऊ महिन्यात प्रशासनाला पाणी पुरवठा व्यवस्थित करण्यात साफ अपयश आले आहे आणि आता प्रशासन अतिरिक्त 30 एमएलडी पाणी मिळत नाही तोपर्यंत पाणीकपात कायमच राहणार असल्याचे
सांगत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लोकसंख्येसोबत पाण्याची मागणी वाढली आहे. 2015-16 मध्ये प्रतिदिन 420 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत होता. यासोबतच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 30 दशलक्ष पाणी पुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठ्यामध्ये वाढ करूनही शहराला समान पाणीपुरवठा होत नसल्याने समस्या गंभीर बनली आहे.
पाणी गळतीची समस्या डोईजड
शहरातील जलवाहिन्या 30 वर्षापूर्वीच्या जुन्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडतात. तसेच अनेक ठिकाणी छोटे-मोठे लीकेज असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होते. पाणी गळती रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून स्काडा प्रणाली अंमलात आणली. मात्र या प्रणालीचा गळती रोखण्यासाठी काहीच उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले. 40 टक्यांहून जास्त पाणीगळती होत असल्याने सुमारे 180 एमलडी पाणी वाया जाते. तसेच गळती होत असल्याने जलशुद्धीकऱण केंद्राच्या सुरवातीच्या भागामध्ये जादा दाबाने तर शेवटी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यासाठी पाणीकपात करून दिवसाआड जास्त दाबाने एक-एका भागात पाणीपुरवठा करणे हाच योग्य पर्याय असल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे. परंतु पाणीकपात कधी बंद होणार याची शहरातील नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत.
सत्ताधारी मात्र निवांत
शहरातील नागरिकांना दररोज पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी पक्षही पाऊले उचलताना दिसत नाही. दिवसाआड पाणी पुरवठा करून नागरिकांना समान पाणी मिळत असल्याच्या प्रशासनाच्या हो मध्ये सत्ताधाऱ्यांनी हो मिळविला आहे. त्यामुळे धरण तुडुंब भरले असले आणि चांगला पाऊस होत असला तरी देखील शहरातील नागरिकांवर पाणीकपातीचे संकट कायम आहे.
दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी अतिरिक्त पाणी लागणार आहे. 30 ते 40 एमएलडी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत अतिरिक्त पाणी उपलब्ध होत नाही. तोपर्यंत पाणीपुरवठा आहे तसाच राहणार आहे.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त