जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे पाचवी युवा संसद
पुणे – “सध्याच्या राजकारणात काय होत आहे? कधी एकत्र न येणारे एकत्र येतायेत. त्यामुळे मी निरीक्षकाची भूमिका घेतली आहे. सध्याची राजकीय स्थित्यंतरे तरुण पिढी पाहत आहे. ही राजकीय परिस्थिती लोकांना चक्रावून सोडणारी आहे,’ असे मत माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मत व्यक्त केले.
नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल ऍन्ड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे पाचव्या युवा संसदेचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, युवा संसदेचे अध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. याप्रसंगी खासदार गजानन कीर्तीकर, डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, आमदार राहुल कुल, पत्रकार महेश म्हात्रे, नगरसेवक प्रशांत जगताप, युवा क्षेत्रात रमणप्रीत यांना आदर्श खासदार, आमदार, नगरसेवक, पत्रकार, युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
विखे पाटील म्हणाले, “चांगले युवा निर्माण होण्याकरीता महाविद्यालयीन निवडणुका व्हायला हव्यात. आम्ही निवडणुकांना भीत नाही, असे म्हणणाऱ्यांनी महाविद्यालयीन निवडणुकांवर बंदी घालणे चुकीचे आहे. आम्ही अशाच निवडणुकांमधून तयार होत पुढे आलो आहोत. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, राजकारणात येण्याकरीता नेतृत्वगुणांची साधना करणे आवश्यक आहे. सरकार चालवणे, नेता बनणे हे सोपे नाही. त्याकरीता प्रशिक्षण व अनुभव असणे गरजेचे आहे.
बदलत्या परिस्थितीचा अभ्यास आवश्यक : खासदार कीर्तीकर
पहाटे 5 वाजता राज्यपालांनी राजवट हटवली. सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदावर आले यानंतर तीन पक्षांचे सरकार आले, ही अघटीत घटना होती. हे सरकार भाजपव्यतिरिक्त आले. शिवसेना ही कॉंग्रेस व राष्ट्रवादीसोबत असे कधी घडले नव्हते. राजकारणात काहीही होऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीचा अभ्यास देखील विद्यार्थ्यांनी करायला हवा, असे खासदार गजानन कीर्तीकर यांनी सांगितले.