मुंबई – विद्यमान सरकारने पुढची कामे पूर्ण करायची असतात मात्र मागची कामे थांबवणे किंवा स्थगिती देणे म्हणजे ही राज्याची अधोगती आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना प्रकल्पांना दिलेल्या स्थगितीबाबत राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली.
मागच्या वर्ष – दीड वर्षात जे निर्णय वेगवेगळ्या ग्रामपंचायतीसाठी किंवा महाराष्ट्रातील हजारो गावांना जो निधी दिला, तो थांबवण्याचे काम जर या सरकारने केले तर त्या गावांची प्रगती थांबवली, प्रगतीत अडथळा निर्माण केला असा होतो, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.
हे सरकार मागे बघायला लागले तर ते कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे या सरकारने मागे न बघता पुढचा विकास म्हणजे भविष्याकडे बघून चालावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. मागच्या वर्ष – दीड वर्षात झालेल्या कामांना वर्कऑर्डर दिली किंवा नाही दिली याच्या खोलात जाऊन आपला वेळ घालवण्यापेक्षा मागची कामे पूर्ण करावी आणि पुढची नवीन कामेही करायला काहीच अडचण नाही असेही जयंत पाटील म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एमआयडीसीतील भूखंड वाटपालाही स्थगिती दिली असून ती स्थगिती कोणत्या उद्देशाने दिली, त्यामागे कोणता हेतू होता हेही तपासले पाहिजे कारण एखाद्या उद्योजकाला भूखंड दिला तर तो पटापट पुढची कामे करायला लागतो आणि राज्यातील लोकांना नोकर्या व रोजगाराची संधी मिळते याचे भान या सरकारला नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
एकतर फॉक्सकॉनसारखा प्रकल्प राज्याबाहेर घालवून यांनी वैचारिक दिवाळखोरी जाहीर केलेली आहे. गुजरातला गेलेल्या प्रकल्पाला थांबवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा उद्योगमंत्री यांनी केला नाही किंवा अनिल अग्रवाल यांना भेटून तो प्रकल्प परत आणण्याचा प्रयत्नही केला नाही. आता ज्या प्रकल्पांना भूखंड देण्यात आले त्या भूखंडानाच स्थगिती देणे म्हणजे उद्योजकांवर हे फार मोठे संकट आहे. त्यामुळे राज्यसरकारने असे वागू नये, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली.