नागठाणे – पावसाची गती मंदावल्यामुळे पर्यटकांच्या पावलांना आता पर्यटनस्थळांची ओढ लागली आहे. सह्याद्री पर्वत रांगेतील भव्य पठारे, घाट माथ्यावरून कोसळणारे धबधबे, ऊन-पावसाचा खेळ हे पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ या पर्वत रांगेत वाढत आहे.
जिल्ह्याचा पश्चिम भाग निसर्गाच्या दृष्टीने समृद्ध, संपन्न मानला जातो. वर्षा ऋतूत इथले सौंदर्य आणखीच खुलते. त्यामुळे पर्यटकांना हा परिसर खुणावताना दिसतो. यापूर्वी कास- ठोसेघर हेच पर्याय पर्यटकांना अधिक जवळचे वाटत असत. आता मात्र बहुतांश पर्यटक हे नव्या वाटांच्या शोधात दिसतात. कास-ठोसेघरचा तो तोचपणा, गर्दी, गोंगाट, वाहतुकीची कोंडी याहून वेगळे काही अनुभवण्याचा प्रयत्न पुढे येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम भागात असलेल्या घाटमार्गांना प्राधान्य मिळत आहे.
गेल्या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान सडक योजना तसेच अन्य निधीतून अनेक घाटरस्ते तयार झाले आहेत. वळणदार रस्ते, भोवताली हिरवळ, छोटे-मोठे धबधबे, तुरळक वाहतूक, पठारावरून दिसणारे विहंगम दृश्य यामुळे घाटमार्गाचा परिसर पर्यटकांच्या पसंतीला उतरत आहेत.त्यातील अनेक ठिकाणांहून पवनचक्की पठारावर जाता येते. कोयना, मराठवाडी, तारळी, उरमोडी, कण्हेर, महू-हातगेघर आदी ठिकाणचे विस्तीर्ण जलाशय पाहता येतात. त्यामुळे पर्यटकांना घाटमार्गाची ओढ लागताना दिसत आहे.