पुणे –शहरात मंगळवारपासून लॉकडाऊनची शिथिलता बंद करण्यात येणार असल्याच्या घोषणेमुळे पुणेकरांची धांदल उडाली आहे. शुक्रवारी या संदर्भातील मेसेज व्हायरल झाल्याने सायंकाळपासूनच किराणा दुकानामध्ये गर्दीला सुरूवात झाली.
महिन्याच्या दि. 1 ते 10 तारखेपर्यंत अनेकांचे पगार होतात. त्यामुळे या काळात किराणा दुकान, फुड शॉपी मध्ये जीवनावश्यक गोष्टींची खरेदी करण्यासाठी गर्दी होतेच. परंतु, लॉकडाऊन होणार असल्याचे समजताच नागरिकांनी शनिवारी सकाळपासूनच दुकानांबाहेर ते उघडण्याच्या आधीच रांगा लावण्याला सुरूवात केली. सुमारे 10 दिवस कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार असल्याने नागरिकांनी भाजी-किराणा याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी शुक्रवारी केले. त्यामुळे हा साठा करण्यासाठी गर्दी केली.
ग्राहकपेठ, डी-मार्टसह विविध ठिकाणच्या फुडशॉपी येथे सकाळपासूनच ग्राहकांनी रांगा लावल्या. दीड-दीड तास रांगेत उभे राहून ग्राहकांनी खरेदी केली. भाजीपाल्याबरोबरच कडधान्यांचाही नागरिकांनी साठा केला. भाजीपाला मिळाला नाही, तर कडधान्यांवर गुजराण करता येईल, या उद्देश्शाने हा साठा केला जात आहे. पण, यातून नियमांचा भंग होत आहे.
साहित्य खरेदीसाठी पुणेकरांनी शनिवारी इतकी गर्दी केली, की तेथे फिजिकल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाला. नागरिकांना रोखताना दुकानदारांची कसरत झाली. अनेक ठिकाणी नागरिक तासन्तास रांगेत उभे राहून फरसाण, भेळ अशा पदार्थांची खरेदी करत होते.