अकोले (प्रतिनिधी) – सदोष बियाण्यांमुळे करंडी गावात बटाटे पिकाला बटाटेच आले नाहीत. त्यामुळे या गावात सर्वच शेतकरी हवालदिल झाले आहेत. बियाने कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
चालू वर्षी करंडी गावामध्ये मोठ्या प्रमाणावर बटाटा पिकाची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी बटाटे बियाणे 2 हजार 200 रुपये ते 2 हजार 600 रुपये प्रतिक्विंटल या दराने शेतकऱ्यांनी खरेदी केले. बियाणे महाग होते, तरीही शेतकऱ्यांनी चढ्या भावाने खरेदी करणे पसंत केले व लागवड केली.
बटाटा पीक साधारणपणे दोन ते अडीच महिन्यांत काढणीला येत असते. परंतु दोन ते अडीच महिने होऊनही करंडी गावातील बटाटा पिकाची पाहणी करता बटाटा पिकाला एकही बटाटा आलेला दिसला नाही. केवळ मुळ्याच दिसल्या शेतकरी हबकून गेला. गावातील सर्वच शेतकऱ्यांच्या बटाटा पिकाची अवस्था सारखीच असल्याने सर्व शेतकरी चिंतेत आहेत. यावेळी कोतूळ विभागाचे कृषी पर्यवेक्षक अशोक धुमाळ यांनी या पिकांची पाहणी केली. यावेळी करंडीमधील जय किसान शेतकरी बचतगटाचे सदस्य, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
मी शेतात बटाटे लावगड केलेली आहे. लोकांकडून हातउसने पैसे घेऊन बटाटा बियाणे लागवड केली. बियाणे, खते, औषधे, मजूर आदींसाठी जवळपास 70 हजार रुपये एवढा खर्च झाला. मात्र झाडाला बटाटे न आल्याने घेतलेले कर्ज कसे फेडावे, हा मोठा प्रश्न आपणासमोर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मदत करावी.
संतोष किसन गोंदके,शेतकरी, करंडी
करोना सारख्या महामारीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या बटाटा पिकाचे खूप नुकसान झाले आहे. तरी शेतकऱ्याला लवकरात लवकर सरकारने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे. तसेच बटाटा पिकासाठी विमा संरक्षण कवच मिळावे.
चंद्रकांत गोंदके, सरपंच, करंडी