नवी दिल्ली : मध्य प्रदेशात मगरीने आठ वर्षाच्या मुलावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सकाळी चंबल नदीत मुलगा आंघोळ करण्यासाठी गेला असता मगरीने त्याच्यावर हल्ला करत मुलाला नदीच्या आत ओढून नेले होते. मात्र आपला मुलगा मेरीच्या पोटात जिवंत असेल या भाबड्या आशेने कुटुंबीयांनी मगरीची सुटका करण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मुलाच्या कुटुंबीयांना बोलावले, गावकऱ्यांनी जाळी, काठ्या आणि दोरीच्या सहाय्याने मगरीला नदीबाहेर काढले. यादरम्यान घटनेची माहिती मिळताच, संबंधित विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांच्या तावडीतून मगरीची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाचे कुटुंबीय मगर सोपवण्यास तयार नव्हते.
मगरीच्या पोटात मुलगा जिवंत असेल अशी त्यांना आशा होता. जोपर्यत मगरीच्या पोटातून मुलगा बाहेर पडत नाही तोवर आपण मगरीला सोडणार नाही अशी भूमिकाच त्यांनी घेतली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुलगा नदीत आंघोळ करताना फार आतमध्ये गेला होता. गावकऱ्यांनी मगरीने मुलाला गिळल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी जाळी आणि काठ्यांच्या सहाय्याने मगरीला पकडलं. यासंबंधी संबंधित विभाग कारवाई करत आहे”. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर अखेर गावकऱ्यांनी मगरीची सुटका केली.