मुंबई : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यातील ऑरेंज आणि ग्रीन झोनबाबतचे निकष बदलण्यात आले आहेत. याविषयीची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
राज्यात ज्या जिल्ह्यात १५ हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रोड झोन तर १४ दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही अशा जिल्ह्याला ऑरेंज झोन आणि २८ दिवस नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही तो ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 20, 2020
आता 14 दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही असा जिल्हा ऑरेंज झोन तर 28 दिवस नव्याने एकही रुग्ण आढळलेला नाही असा जिल्हा ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे, असे राजेश टोपे म्हणाले. तर ज्या जिल्ह्यात 15 हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रेड झोन असेल, असेही टोपे यांनी सांगितले.
कोरोनाच्या प्रभावानुसार राज्यातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. याआधी रुग्ण संख्या हा प्रमुख निकष होता. त्यानुसार 15 पेक्षा कमी रुग्ण म्हणजे ऑरेंज झोन आणि रुग्ण नाही म्हणजे ग्रीन झोन असे निकष होते. परंतु आता किती दिवसात रुग्ण आढळले हा झोन ठरवण्याचा निकष असेल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.