मुंबई – करोना काळात देशावर इंधन दरवाढीचे संकट गडद होत चालले आहे. देशात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर अनेक उद्योगधंदे बंद असल्याने सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. देशात पेट्रोल-डिझेल दर वाढ सातत्याने सुरू असल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला आहे. देशासह राज्यात ठिकठिकाणी आज कॉंग्रेसकडून इंधन दरवाढीचा निषेध करत केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ केली गेली आहे. करोनामुळे झालेली अर्थव्यवस्थेची तूट भरून काढण्यासाठी इतर देश थेट देशाच्या तिजोरीतून लोकांना मदत करत आहे. मात्र केंद्र सरकार अतिरिक्त कर लावून लोकांकडूनची लुबाडणूक करत आहे, असा आरोप करत महाराष्ट्र कॉंग्रेसने सोमवारी राज्यभर आंदोलन केले.
देशात दररोज पेट्रोल डिझेलचे दर वाढत असल्याने आज अमरावतीत कॉंग्रेसच्या वतीने अमरावतीच्या इर्विन चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी इंधन दरवाढीचे फलक हातात घेऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच इंधनाचे दर कमी करा, अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित आहेत.
देशातील नागरिक करोनामुळे अडचणीत आले असताना केंद्र सरकारने गेल्या 19 दिवसांपासून दररोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढवीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी असताना ही दरवाढ करीत असल्याने सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. या केंद्र सरकारच्या अन्यायकारक पिळवणुकी विरोधात कॉंग्रेस तर्फे निषेध करण्यात आला आहे.
लातूरमध्ये आमदार धीरज देशमुख यांनी सायकल रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांनी यांना दरवाढीबाबत निवेदन देण्यात आले. तसेच औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सोशल डिस्टंसिंग ठेवत हे आंदोलन केले.