मुंबई: प्रियंका गांधी यांची सुरक्षा आणि निवासस्थान काढून घेणे हे दुर्देवी आहे. प्रियंका गांधी यांनी त्यांच्या आजी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांचा मृत्यू पाहिला आहे. आजही त्यांच्या कुटुंबावरील संकटे संपलेली नाहीत त्यांना धोका असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
थोरात म्हणाले, केवळ राजकारण म्हणून त्यांना त्रास देणे योग्य नाही. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढते आहे. प्रियंकाजी सरकारच्या चुकीच्या निर्णयाबद्दल प्रश्न विचारत आहेत. त्यांनी प्रश्न विचारू नयेत म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे.
सरकारकडे या प्रश्नांची उत्तरे नाहीत म्हणून अशा गोष्टी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार आहे पण प्रियंकाजी राहुलजी आणि काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी सरकारला प्रश्न विचारत राहील आणि जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करत राहील, असे थोरात यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब थोरात यांनी चंद्रकांत पाटलांवर देखील निशाणा साधला. चंद्रकांत पाटील विरोधी पक्ष म्हणून फेल ठरले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीवर बोलू नये. आम्ही एकत्र चांगलं काम करत आहोत.