नवी दिल्ली – आसाम आणि मिझोराममधील सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. त्यावरून दोन्ही राज्यांत न्यायालयीन लढा सुरू होण्याची चिन्हे आहेत. आसाम आणि मिझोराममधील सीमावादाला नुकतेच हिंसक वळण मिळाले. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशातून केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला.
मात्र, ती राज्ये आपापल्या भूमिकांवरून हटण्यास तयार नसल्याने त्यांच्यातील सीमावाद न्यायालयात पोहचण्याची शक्यता आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी नुकताच मिझोरामने आपल्या राज्याची भूमी बळकावल्याचा आरोप केला.
सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इरादाही त्यांनी बोलून दाखवला. त्यावर मिझोराम सरकारकडून गुरूवारी प्रतिक्रिया देण्यात आली. त्या सरकारने आसामच्या भूमीवर अतिक्रमण केल्याचा दावा फेटाळून लावला. आम्ही केवळ आमच्या भूमीचे रक्षण करत आहोत. ते सिद्ध करणारी कागदपत्रे आमच्याकडे आहेत.
त्यामुळे कुठल्याही न्यायालयीन खटल्याला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे, असे मिझोराम सरकारने म्हटले. त्यामुळे सीमावादावरून दोन्ही राज्यांमधील धुसफूस इतक्यात थांबणार नसल्याचेच संकेत मिळत आहेत.