पुणे – प्रसिद्ध नाटककार आणि अभिनेते गिरिश कर्नाड यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कर्नाड यांनी पुण्यातील “फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट” (एफटीआयआय)चे अध्यक्ष आणि संचालक म्हणून काम पाहिले होते. त्यांची 1974 ते 1975 या काळात संचालकपदी तर 1999 ते 2001 या काळात अध्यक्षपदी निवड झाली होती. त्याकाळी त्यांनी घेतलेले निर्णय, सुरू केलेले अभ्यासक्रम आजही यशस्वीपणे सुरू आहेत.
गिरीश कर्नाड हे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होते. त्यांची विविध विषयांचा अभ्यास करून केलेली अभ्यासपूर्ण मांडणी वैशिष्ट्यपूर्ण होती. “रोडेज’ शिष्यवृत्ती आणि “ऑक्सफर्ड’ची पदवी असणारे ते “एफटीआयआय’चे सर्वात तरुण संचालक होते. बुद्धिमत्ता आणि ग्लॅमर या दोन्हीचे मिश्रण म्हणजे गिरिश कर्नाड होते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
– अशोक विश्वनाथन, अधिष्ठाता (सत्यजित रे फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, कोलकाता)
गिरीशबाबत आम्ही एकत्रपणे केलेले काम, दोन वर्षांपूर्वी त्यांनी बंगलुरुमध्ये माझ्या आत्मचरित्राचे प्रकाशन केले, अशा अनेक आठवणी आहेत. गिरिश यांचे व्यक्तिमत्त्व अनोखे होते. त्यांच्यासारखी “जमिनीवर पाय असणारी’ व्यक्ती अतिशय दुर्मिळ आहे. “वंश वृक्ष’ या प्रोजेक्टमध्ये पहिल्यांदा त्यांच्याबरोबर काम केले. त्यांच्याबरोबरच्या अनेक आठवणी आजही ताज्या आहेत.
– अरुणाराजे पाटील, माजी विद्यार्थिनी (1969)
गिरीश कर्नाड यांच्या निधनाने साहित्य, कला आणि वैचारिक क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. कर्नाड हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. साहित्य, चित्रपट, रंगभूमी यासह वैचारिक क्षेत्रातही त्यांचे विशेष स्थान होते. कन्नडबरोबर मराठी चित्रपट तसेच नाटकांमधूनही त्यांनी काम केले. “ज्ञानपीठ’, “कालिदास सन्मान’, “साहित्य अकादमी’, “संगीत अकादमी’ सह विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. “फिल्म ऍन्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट’मध्ये त्यांनी केलेली भरीव कामगिरी सदैव स्मरणात राहील.
– गिरीश बापट, खासदार
संचालकपदी निवड झालेले कर्नाड हे सर्वात पहिले आणि तरुण अशासकीय अधिकारी होते. त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रशासकीय कामकाज, स्पष्टवक्तेपणा आणि त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे “एफटीआयआय’मधील सर्वांच्याच कायम ते स्मरणात राहतील. गिरिश कर्नाड यांच्या जाण्याने “एफटीआयआय’ने नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती गमावली.
– भूपेंद्र कॅन्थोला, संचालक, एफटीआयआय
गिरीश कर्नाड हे भारतीय रंगभूमीवरील सर्वात मोठे नाव आहे. गिरीशची वेगळी बाजू म्हणजे तो अत्यंत तार्किक आणि विद्वान होता. तो आधुनिकतेचा प्रवक्ता बनला होता. त्याच्याशी बोलताना त्याच्यातील “स्पार्क’ लक्षात येत असे. यातून त्याचे समृद्ध व्यक्तिमत्त्व तयार झाले होते. चित्रपट, नाटक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गिरीश कर्नाडचे वेगळे महत्त्व आहे. मोहन राकेश हिंदीमध्ये, बादल सरकार बंगालमध्ये, तेंडूलकर मराठीमध्ये आणि गिरीश कन्नडमध्ये हे सगळे एकत्र आले आणि नॅशनल थिएटर निर्माण झाले. त्यांच्यामुळे प्रत्येक भागांतील नाटके समृद्ध झाली. त्याची नाटके “मिथकां’शी “कनेक्टेड’ असायची.
– डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक