अपंग शाळांना अनुदान वाढवण्याच्या मागणीसाठी संरक्षक जाळीवर उडी
मुंबई: राज्यातील अपंगांच्या शाळांना अनुदान वाढवावे या मागणीसाठी आज सायंकाळी दोन व्यक्तींनी मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केले, पण पहिल्या मजल्यावर असलेल्या संरक्षक जाळीवर ते पडल्याने त्यांचे प्राण वाचले. सध्या या दोघांना मंत्रालयातील सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे.
राज्यातील अनेक अपंगाच्या शाळांना वाढीव अनुदान मिळालेले नाही. हे अनुदान मिळावे या मागणीसाठी राज्यभरातील अनेक शिक्षक आणि संस्थाचालक आज मंत्रालयात आले होते. पण त्यांच्या या मागण्यांवर आज कोणताही निर्णय झाला नाही. आचारसंहिता लागू व्हायला एक किंवा दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे हा निर्णय आता पुढील दीड महिन्यासाठी लांबणीवर पडेल या निराशेतून एक संस्थाचालक हेमंत पाटील(चाळीसगाव) आणि अरुण नेटोरे यांनी मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उड्या घेतल्या.
दिव्यांगाच्या कायम विना अनुदानित शाळांचा कायम शब्द काढण्यासाठी गेले अनेक वर्षांपासून लढणाऱ्या शिक्षक संस्थाचालक आणि शिक्षकांनी आज मंत्रालयात सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या, तर एक संस्थाचालक हेमंत पाटील(चाळीसगाव) आणि अरुण नेटोरे यांनी मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीवर उडी मारून आंदोलन केले.यामुळे पोलीस यंत्रणेची जोरदार पळापळ झाली.