पुणे : करोना विषाणू संसर्गामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे प्रामुख्याने उन्हाळ्यात होणारी लग्ने लांबली आहेत. मात्र, फुरसुंगी येथील वकील जोडप्याने ठरलेल्या तारखेला सोशल डिस्टन्स पाळत नुकतेच लग्न केले. प्रत्येकी पाच माणसे आणि दोघांचे आई-वडील उपस्थित होते. विशेष म्हणजे साध्यापणाने झालेल्या लग्नामुळे वाचलेला पैसा सामाजिक कार्यासाठी खर्च करण्यात येणार आहे.
गणेश हरपळे आणि श्यामल कामठे असे या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. दोघेही पेशाने वकील असून हरपळे हे शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात प्रॅक्टीस करतात तर त्यांची पत्नी श्यामल न्यायाधीश होण्यासाठी आवश्यक असलेल्या परीक्षांची तयारी करत आहेत. देशात कोरोना विषाणू पसरन्यापूर्वीच त्यांची लग्नाची तारीख निश्चित झाली होती. त्यामुळे लग्नाची बरीचशी तयारी देखील पूर्ण केली होती. त्यामुळे तारीख न टाळता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तसेच करोनाचा प्रादुर्भाव देखील होऊ दिला नाही.
याबाबत हरपळे म्हणाले यांनी सांगितले की, करोनामुळे देशात भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या लॉकडाऊन सुरु आहे. करोनाचे हे संकट किती दिवसांनी टळेल याची कल्पना नाही. त्यामुळे आम्ही दोन्हीकडील प्रत्येक पाच माणसे आणि दोघांचे आई-वडील अशा मोजक्या माणसांत लग्न लावले. लग्नावेळी सोशल डिस्टन्स पाळण्यात आले होते. तसेच करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक असलेल्या सर्व खबरदार्या आम्ही घेतल्या होत्या.