नवी दिल्ली : देशातील सर्वात उंच इमारत म्हणजेच ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त करण्यात आली आहे. नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर अखेर पाडण्यात आले आहे. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणारा ट्विट टॉवर आज शेवटी पाडण्यात आला आहे. काही सेकंदामध्ये हे बहुमजली टॉवर्स कोसळली. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले होते.
एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले होते. हे ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी 46 जणांची टीम तयार करण्यात आली. ही टीम दररोज सुमारे 12 तास स्फोटके लावण्याचे काम करत होती. स्फोटकांच्या मदतीने अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे हे दोन टॉवर जमीनदोस्त झाले. विशेष म्हणजे, बहुमजली टॉवर्स पाडल्यानंतर 30 मीटर उंचीपर्यंत याचा ढिगारा तयार झाला. हे टॉवर्स पाडल्यानंतर परिसरात शेकडो मीटरपर्यंत धुळीचं साम्राज्य पसरले होते. खरेदीदारांच्या तक्रारीनंतर कोर्टाने ट्विन टॉवर म्हणजे अॅपेक्स (32 मजली) आणि सियान टॉवर्स (29 मजली) पाडण्याचे आदेश दिले होते.
— ANI (@ANI) August 28, 2022
सर्वोच्च न्यायालयाने 31 ऑगस्ट 2021 रोजी ट्विन टॉवर्स पाडण्याचे आदेश दिले होते, मात्र त्यासाठी कोर्टाने 3 महिन्यांचा अवधी दिला होता. मात्र त्यानंतर तसे होऊ शकले नाही. त्यानंतर त्याची तारीख 22 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली. पण टॉवर पाडण्याची तयारी पूर्ण झाली नाही, त्यामुळे टॉवर पाडण्याचं काम पुढे ढकलण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी टॉवर पाडणाऱ्या कंपनीला आणखी 3 महिन्यांची वाढीव मुदत दिली होती. त्यानंतर 21 ऑगस्ट 2022 रोजी तो पाडायचा होता. मात्र त्यानंतर टॉवर पाडणाऱ्या एडफिस इंजिनिअरिंग कंपनीला एनओसी मिळाली नाही. त्यामुळे आणखी एक आठवडा मुदत वाढवून देण्यात आली. आता 28 ऑगस्टला टॉवर पाडण्यात येणार आहे.
खरेदीदारांचा आरोप आहे की, हे टॉवर बनवताना नियम डावलण्यात आले आहेत. सोसायटीतील रहिवासी यूबीएस तेवतिया सांगतात की, टॉवरची उंची जसजशी वाढत जातं, तसतशी दोन टॉवरमधील अंतर वाढत जातं. अग्निशमन अधिकाऱ्यांनी स्वत: सांगितलं की, एमराल्ड कोर्ट ते एपेक्स किंवा सिएना हे किमान अंतर 16 मीटर असावं. पण एमराल्ड कोर्टच्या टॉवरपासून त्याचं अंतर फक्त 9 मीटर होतं. या नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल नोएडा प्राधिकरणाकडून अग्निशमन अधिकाऱ्यांना कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही. उंच टॉवरच्या उंचीवर वारा, सूर्यप्रकाश थांबतो, त्यामुळे दोन टॉवर्समध्ये 16 मीटर अंतर असावं, असा नियम आहे.
दोन टॉवर्समधील अंतर कमी असल्याने आग पसरण्याचा धोका वाढतो. खरेदीदारांचा आरोप आहे की, टॉवर्सच्या नव्या नकाशात या गोष्टींची दखल घेण्यात आली नव्हती. तेवतिया म्हणतात की, बिल्डरने आयआयटी रुरकी येथील सहाय्यक प्राध्यापकाची वैयक्तिक मान्यता घेऊन बांधकाम सुरू केले. तर अशा प्रकल्पात आयआयटीची अधिकृत मान्यता आवश्यक आहे जी येथे पाळली गेली नाही.