नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच देशाची वित्तीय तूट 83.2 टक्के म्हणजेच 6.62 लाख कोटी रूपयांवर गेली आहे. करोनाच्या लॉकडाऊनच्या काळामुळे देशातील कर महसुलात झालेली घट हे त्याचे एक प्रमुख कारण दिले गेले आहे.
गेल्यावर्षी याच काळातील वित्तीय तूट 61.4 टक्के इतकी होती.केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षातील वित्तीय तूट 7.96 लाख कोटी म्हणजेच 3.5 टक्के इतकी राखण्याचे उद्दीष्ठ ठेवले होते पण त्याच्याही खूप पुढे ही तूट जाईल असेच संकेत यातून मिळत आहेत.
लेखा परिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल ते जून या तीन महिन्यातील एकूण तूट 6 लाख 62 हजार 363 कोटी रूपये इतकी झाली आहे. गेल्या सात वर्षातील तूटीचा हा एक उच्चांक मानला जातो. या तीन महिन्याच्या काळात अर्थसंकल्पीय अंदाजाच्या केवळ 8.2 टक्के इतकाच कर महसुल सरकारकडे जमा झाला आहे. ही रक्कम 1 लाख 34 हजार 822 कोटी रूपये इतकी आहे. हा कर रूपातून मिळालेला पैसा आहे.
त्या खेरीजचे अन्य उत्पन्न लक्षात घेतले तर या तीन महिन्यात सरकारकडे जमा झालेली एकूण रक्कम 1 लाख 53 हजार 581 कोटी रूपये इतकी आहे.
सरकारने या संपुर्ण आर्थिक वर्षात एकूण अपेक्षित जमा 22 लाख 45 हजार कोटी इतकी धरली आहे. हे लक्ष गाठणे आता अवघड बनत चालले आहे असेच सध्याचे चित्र आहे.