सातारा – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अधिवेशनात अदानींविषयी विचारलेल्या प्रश्नांची मिरची मोदी सरकारला झोंबली असून यातूनच गुजरात खटल्याचे निमित्त करून त्यांची खासदारकी रद्द केली आहे. हा राजकीय कटाचाच एक भाग आहे. मोदी- अदानी युतीमुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे, अशी टीका अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव पृथ्वीराज साठे यांनी केली.
जिल्हा कॉंग्रेस समिती कार्यालयातील पत्रकार परिषदेत श्री. साठे बोलत होते. ते म्हणाले, “”देशाच्या राजकीय पटलावर अनेक घटना घडल्या असून त्यानुसार कॉंग्रेसने 31 मार्चपासून राष्ट्रीय पातळीपासून ते गावपातळीपर्यंत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत आहोत. मोदी- अदानी या युतीची माहिती लोकांना देण्याचे काम हाती घेतले आहे. खासदार राहुल गांधी यांना अचानकपणे दोन वर्षे शिक्षा सुनावून त्याची खासदारकी रद्द केली. दिल्लीच्या शासकीय निवासस्थानातून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. सात फेब्रवारीला मोदी- अदानी संबंधांचे मुद्दे संसदेत उपस्थित केले.
राहुल यांनी असे काय मुद्दे उपस्थित केले, ज्याची मिरची मोदी सरकारला लागली. सत्ताधारी पक्षाचे खासदार आधिवेशन चालू देत नाही हे अनाकलनीय आहे.” अदानीच्या बंधूंच्या सेल कंपनीतील वीस हजार कोटीची गुंतवणूक कोणाची, हा प्रश्न अनुत्तरित आहे. संरक्षण विभागाची कंत्राटे चिनी कंपन्यांना देऊन देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जात आहे, असा आरोप करून पृथ्वीराज साठे यांनी पंतप्रधान मोदी देशासाठी जातात की अदानीच्या कंपनीचे ब्रॅण्डिंग करायला, असा टोला लगावला. एलआयसी कंपनीसुध्दा अदानी समूहाच्या माध्यमातून अडचणीत आणण्याचे काम मोदींनी केले.
राहुल गांधी यांची खासदारकी का रद्द केली, याचे स्पष्ट उत्तर अद्याप मिळालेले नसल्याचे त्यांनी सांगितले. मोदी- अदानी युतीमुळे देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे निघाली आहे. अदानी- मोदींचा कारभार थांबवून देश वाचविला पाहिजे, त्यासाठी ही जनजागृती सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, उदयसिंह पाटील- उंडाळकर, रणजितसिंह देशमुख, राजेंद्र शेलार, नरेश देसाई, रजनी पवार, अजित पाटील चिखलीकर, धनश्री महाडिक, मालन परळकर, रजिया शेख, अरबाज शेख आदी उपस्थित होते.