नवी दिल्ली – पुढील वर्षी जुलै महिन्यापर्यंत देशभरातील 20-25 कोटी नागरिकांपर्यंत करोनाच्या लसीचे 40-50 कोटी डोस देण्यात येतील. या संदर्भात राज्यांसाठी लवकरच एक प्रारुप आराखडा तयार करण्यात येईल आणि ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत ही लस देण्यासाठीच्य प्राधान्यक्रमाची यादी तयार केली जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. करोनाच्या लसीसंदर्भात जे कर्मचारी कोविड-19 वरील उपचाराच्या कामात सक्रिय आहेत, त्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, असेही हर्ष वर्धन यांनी सोशल मिडीयावरील “संडे संवाद’ या कर्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले.
केंद्र सरकार मनुष्यबळ, प्रशिक्षण, निरीक्षण यामध्ये क्षमतावृद्धी करण्याचे नियोजन करत आहे आणि जुलै 2021 पर्यंत 400-500 दशलक्ष डोस 20-25 कोटी लोकांना देण्यात येतील, असे प्राथमिक नियोजन आहे. आरोग्य विषयाबाबत नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती सर्व प्रक्रियेचे नियोजन करत आहे, असेही हर्ष वर्धन यांनी सांगितले.
या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी मनुष्यबळाचे प्रशिक्षण, देखरेख आणि अन्य जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मनुष्यबळाच्या क्षमतावृद्धीकडेही सरकार लक्ष देत आहे. या लसीकरणासाठी आवश्यक लसीची खरेदी केंद्रीय पद्धतीनेच होणार असून वेगवेगळ्या टप्प्यांवरील उद्दिष्टे निश्चित करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.