नवी दिल्ली : देशात दोन वर्षांपूर्वी बुराडीत झालेल्या सामूहिक आत्महत्येच्या घटनेने एकच खळबळ माजली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा देशाला हादरवून सोडणारी घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. जिथे एकाच घरात पाच सदस्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. जेव्हा पोलिसांनी घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांना घरातले चार सदस्य वेगवेगळ्या खोल्यांमध्ये छताच्या पंख्याला लकलेले आढळले. तर नऊ महिन्यांच्या मुलीचा मृतदेह बेडवर पडलेला आढळला. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
पोलिसांना आढळून आलेल्या मृतदेहांमध्ये 9 महिन्याच्या मुलीचाही करुण अंत झाला आहे. मात्र या चिमुकलीचा मृत्यू कुटुंबीयांच्या मृत्यूनंतर उपासमारीने झाला असावा, असा अंदाज काही रिपोर्टमधून व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अडीच वर्षांच्या मुलीला घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. तिला सध्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. भारती (51 ), सिंचन (34 ), सिंधुराणी (31 ) आणि मधुसागर (25 ) अशी मृतांची नावे आहेत. डीसीपी (पश्चिम) संजीव एम.पाटील यांनी सांगितलं की, पत्रकार हुलागुरे शंकर चार दिवसांनी घरी गेल्यावर ही घटना उघडकीस आली.
शंकरने घराचा दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो उघडू शकला नाही. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला, त्यानंतरचे दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली, अशी माहिती पोलीस अधिकारी पाटील यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, घरात प्रवेश केल्यावर चार लोकांचे मृतदेह वेगवेगळ्या खोलीत पंख्याला लटकलेले आढळले. तर एका मुलीचा मृतदेह बेडवर मृतावस्थेत आढळला.
दिल्लीमधल्या बुराडी येथेही असेच एक प्रकरण समोर आले होते, जिथे एकाच घरातील 11 लोकांनी एकत्र आत्महत्या केली होती. कुटुंबाने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. चिठ्ठीत लिहिले होते की, आम्ही हे मोक्ष मिळवण्यासाठी करत आहोत. 1 जुलै रोजी घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.