भोपाळ – शिक्षण खाते सांभाळणारे दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना तुरूंगात धाडण्यात आले. त्या घडामोडीमुळे शिक्षणाचे महत्व समजण्यासाठी देशाला सुशिक्षित पंतप्रधानांची गरज असल्याचे माझे मत बनले, असे उपरोधिक भाष्य दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केले.
केजरीवाल यांचे प्रमुख सहकारी असणाऱ्या सिसोदिया आणि माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना भ्रष्टाचार, मनी लॉण्डरिंगच्या आरोपांवरून अटक करण्यात आली. त्याचा संदर्भ घेऊन केजरीवाल यांनी मध्यप्रदेशातील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. सुशिक्षित पंतप्रधानांना अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि विज्ञानाची जाण असते.
त्याउलट, कमी शिक्षित असणाऱ्या पंतप्रधानांना कुणीही फसवू शकते. करोना घालवण्यासाठी कुणी पंतप्रधानांना थाळ्या वाजवण्याचा सल्ला देऊ शकते. तर, कुणी भ्रष्टाचार, दहशतवाद संपवण्यासाठी नोटाबंदी करण्याचे सुचवू शकते. पण, थाळ्या वाजवल्याने करोना गेला का? नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, दहशतवाद थांबला का, अशा प्रश्नांची सरबत्ती केजरीवाल यांनी केली.
सिसोदिया आणि जैन यांनी दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांत लक्षणीय सुधारणा घडवल्या. पण, खासगी घटकांचे हित साधले जाणार नसल्याने मोदींना त्या सुधारणा रूचल्या नाहीत. भ्रष्ट व्यक्ती शाळा आणि रूग्णालये बांधेल का? उलट, भ्रष्ट व्यक्ती खासगी घटकांच्या फायद्यासाठी सरकारी शाळा आणि रूग्णालये उद्धवस्त करेल. आपने दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांत सरकारे स्थापन केली. तर, गुजरातमध्ये तब्बल 14 टक्के मतं मिळवली. त्यामुळे धास्तावलेल्या भाजपने आमच्यावर चिखलफेक सुरू केली, असा आरोप त्यांनी केला.