नवी दिल्ली- राज्यसभेच्या काल झालेल्या कामकाजात भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने पेगॅसस प्रकरणात त्यांच्या विभागाची भूमिका मांडताना आम्ही पेगॅसस खरेदी केलेले नाही असे स्पष्ट केले आहे.
तथापि, केवळ संरक्षण विभागाने हे स्पष्टीकरण देणे पुरेसे नाही अशी विरोधकांची भूमिका आहे. सरकारच्या सर्व मंत्रालयाच्या वतीने पंतप्रधान मोदींनीच उत्तर दिले पाहिजे अशी भूमिका कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी घेतली आहे.
या प्रकरणात मोदी मौन का बाळगून आहेत, असा सवालही चिदंबरम यांनी पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला आहे. संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी काल राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले की, संरक्षण मंत्रालयाने एनएसओ नावाच्या इस्त्रायली कंपनीशी कोणत्याही तंत्रज्ञानाबाबत कोणताहीं व्यवहार केलेला नाही.
त्यावर प्रतिक्रिया देताना चिदंबरम यांनी म्हटले आहे की, जरी संरक्षण राज्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर खरे मानले तरी या विषयी ज्या मंत्रालयांवर शंका आहे त्या अन्य मंत्रालयांच्या भूमिकांचे काय याचेही उत्तर मिळाले पाहिजे.