अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांचे वक्तव्य
नवी दिल्ली : देशातील सध्याच्या परिस्थितीवरून सर्वच जण सरकारला धारेवर धरताना दिसत आहेत. विरोधी पक्षाने तर देशाच्या अर्थव्यवस्थेवरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता नोबेल पुरस्काराने सन्मानित अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी देखील भारतातील राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे. लोकशाहीचे ह्रदय असलेल्या आणि सत्ताधारी पक्षावर लक्ष ठेवणाऱ्या सक्षम विरोधी पक्षाची भारताला गरज आहे. सत्ताधारी पक्षानेही हे बघितले पाहिजे, असे मत बॅनर्जी यांनी व्यक्त केले. जयपूर येथे सुरू असलेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बॅनर्जी बोलत होते.
जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलताना अर्थतज्ज्ञ बॅनर्जी यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केली. देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी बोलताना, अर्थव्यवस्थेच्या समस्येतून भारत लवकर बाहेर पडेल असे वाटत नाही. त्यासाठी दीर्घळाळ लागेल. अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल इतका पैसा सध्या आपल्याकडे नाही. बॅंकिंग सेक्टरमध्येही पैसा लावू शकू अशी आपली परिस्थिती नाही. पण, अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची गरज आहे,असे त्यांनी सांगितले.
गरिबी ही कॅन्सरसारखीच असते. कॅन्सरमुळे जशा विविध व्याधी जडतात, तसेच गरिबीचे असते. काही लोकांकडे शैक्षिणक दारिद्रय असते. काही लोकांकडे आरोग्याचे, तर काही लोकाकडे संपत्तीचे दारिद्रय असते. त्यामुळे आपण काय गमावले हे आपणच शोधले पाहिजे. कठोर परिश्रम करून या समस्येवर तोडगा काढला पाहिजे असेही बॅनर्जी म्हणाले.
देशातील नागरिकांनी धर्म आणि जातीच्या आधारे मतदान करू नये. आम्ही उत्तर प्रदेशात एक मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी लोकांना धर्म आणि जातीच्या आधारे मतदान न करण्याचे आवाहन केले. विकास आणि इतर दैनंदिन मुद्दे लक्षात घेऊन लोकांनी मतदान करावे हा या मोहिमेमागचा उद्देश होता. मुलांना प्रत्येक विषय समजत नसतो. त्यांना ज्या विषयात रुची आहे, तोच विषय त्यांना समजतो. त्यामुळे त्यांना जे समजते तेच शिकवले पाहिजे. चौथीच्या मुलांना समाजशास्त्र शिकवून चालणार नाही. कारण समाजशास्त्रासाठी वाचन खूप करावे लागते. त्यामुळे मुलांचा वाचनात रसच नसेल तर माहिती नसलेल्या भाषेतील सिनेमा पाहताना जी अवस्था होते, तिच या मुलांची होते असे बॅनर्जी यांनी यावेळी म्हटले.