मुंबई: पंतप्रधान मोदी एकाधिकारशाहीची भाषा करतात. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासाच्या मुद्द्यांना पुढे नेत बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली. मात्र, आता त्याच मुद्द्यांवर न बोलणारे पंतप्रधान साम दाम दंड भेदचा वापर करुन 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. उरी, पुलवामा सारख्या भ्याड हल्ल्याची जबाबदारी न घेता शहीद सैनिकांच्या जिवावर मतांचं राजकारण करत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. ते प्रदेशाध्यक्ष पदाच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेसबुक पेजवरून लाइव्हद्वारे बोलत होते.
त्याचप्रमाणे केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारच्या कार्यपद्धतीचा खरपूस समाचार घेतला. मोदी सरकार राफेल निर्णय लांबणीवर टाकून देशाची आणि महाराष्ट्राची दिशाभूल करत असले तरी, यावेळी जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर देखील गांभीर्याने भाष्य केले. महाराष्ट्रात दुष्काळाचा प्रश्न ज्वलंत असताना भाजप सरकार दुष्काळावर ठोस पाऊले उचलत नसून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले. आघाडी सरकारच्या काळात पाणी अडवा पाणी जिरवा योजनेअंतर्गत जल संधारणाची अनेक कामे यशस्वीपणे पूर्ण केली. मात्र, राजकीय द्वेषापोटी हे सरकार बंद पडलेल्या चारा छावण्या पुन्हा सुरू करत नसल्याचे सांगितले. तसेच राज्यातील दुष्काळाला हे सरकार जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली.