नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. त्यातच देशातील प्रत्येक राज्यात आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असून नागरिकांचे प्राण जात आहेत. दरम्यान, देशातील या परिस्थितीवर आता जागतिक स्तरावर चर्चा सुरु झाली आहे. देशातील या परिस्थितीला केंद्र सरकारचा निष्काळजीपणा आणि त्यांची धोरणे जबाबदार असल्याचे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
देशातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत जगभरातील माध्यमांनी भारताला दोष दिला असून टीकेचा चढा सूर लावला आहे. दुसऱ्या लाटेपुढे भारतातील आरोग्यव्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत आहे. प्राणवायू टाक्या, खाटा, रेमेडेसिविरसारखी औषधे यांचा तुटवडा आहे. काही ठिकाणी त्याचा काळा बाजारही होत आहे. दिल्लीत रुग्णच प्राणवायू सिलिंडर घेऊन येताना दिसले. गेल्या वर्षी स्थलांतरितांचे जे लोंढे दिसले त्याची पुनरावृत्ती यावेळीही झाली. या वास्तवाचे तपशिलात वृत्तांकन आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केलेले आहेच, पण परदेशी दैनिकांच्या वृत्तलेख व संपादकीयांनी भारतीय नेतृत्वाच्या गफलतींचाही पाढा वाचला आहे.
‘‘पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या स्वत:च्या आकलनाने काही निर्णय घेतले. तज्ज्ञांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले, त्यांच्या चुकांचे परिणाम आज भोगावे लागत आहेत’’ असे ब्रिटनच्या नामांकित वृत्तपत्राने अग्रलेखात म्हटले आहे. ‘‘नरेंद्र मोदींच्या अतिआत्मविश्वासामुळे हे सारे घडले. मोदींनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्बंध कसे राखावेत याचा विचार करायला हवा होता. आपण जे बोलतो ते करतो हे दाखवायला हवे होते. भविष्यातील इतिहासकार या निर्णयांबाबत मोदींचे कठोर मूल्यमापन करतील,’’ असेही या अग्रलेखात म्हटले आहे.
अमेरिकेतील एका महत्त्वाच्या वृत्तपत्राने भारतात टाळेबंदी फार आधी लावली गेल्याबाबत टीकास्त्र सोडले आहेच आणि दुसरी लाट वाढत असूनसुद्धा क्रिकेट, कुंभमेळा आणि इतर धार्मिक कार्यक्रम कुठल्याही नियमनाविना साजरे झाल्याबद्दल त्यांनी केंद्रीय नेतृत्त्वाचे वाभाडे काढले. हे सारे टाळता आले असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आणखी एका वृत्तसंस्थेने भारतीय आरोग्य यंत्रणेतील ढिसाळ कारभारावर बोट ठेवले.‘‘या सगळ्यास पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत. अनेक इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. मंत्रिमंडळातील मंत्री खुशामतखोर आहेत; त्यांनी कोविड १९ लाट यशस्वीपणे हाताळल्याबाबत मोदींची प्रशंसा तेवढी केली. त्यानंतर चाचण्याही कमी झाल्या. लोक विषाणू गेला असे वर्तन आत्मसंतुष्टतेतून करू लागले ते अंगाशी आले आहे.’’ – असे परखडपणे सुनावणाऱ्या वृत्तलेखात एका साप्ताहिकाने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील परिस्थितीही राज्यातील राजकारण्यांनी एकमेकांवर कुरघोड्यांचे राजकारण केल्याने बिघडली. विषाणूची लाट परत आली तेव्हा हे गाफील होते व जेव्हा खरे काही करायचे होते तेव्हा राजकारण करीत राहिले, असेही या लेखात म्हटले आहे.
‘‘कोविड १९ बाबत आत्मसंतुष्टता भारताला नडली त्यामुळे आताची दुरवस्था ओढवली आहे. रुग्णांची संख्या खूप वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त आहे. पण हा सगळा प्रकार योग्य धोरणे राबवली असती तर टाळता आला असता,’’ असे ऑस्ट्रेलियाच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. चीनच्या आणि पाकिस्तानच्या वृत्तपत्रानेही भारताच्या करोना हाताळणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.