दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांचा दावा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री नोटाबंदीचा निर्णयाची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयावर अजूनही टीका होत आहे. विशेषतः नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाल्याचे अर्थतज्ज्ञांकडून सातत्याने सांगितले जात आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्याने नोटबंदी केल्याच्या निर्णयाला नकार दिला आहे. मोदी सरकारने नोटबंदी केली नव्हती, तर नोटाबदलून दिल्या, असा दावा भाजपाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. दरम्यान, प्रचार धुमाळीत भाजपाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांनी चक्क मोदी सरकारने नोटाबंदी केल्याचा इन्कार केला आहे. एका मुलाखतीत तिवारी यांनी हा दावा केला आहे. नोटबंदीच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना खासदार मनोज तिवारी म्हणाले, नोटबंदी झाल्यानंतर लोकांना अडचणी आल्या, त्रास झाला. पण, नोटबंदी करण्यामागे जो उद्देश होता, तो खूप मोठा होता. उद्देश पूर्ण झाला, असे त्यांनी सांगितले. त्यावर मोदी सरकारनं नियुक्त केलेल्या गव्हर्नर ऊर्जित पटेल, देशाचं अर्थ मंत्रालयाला नोटबंदीसंदर्भात जे उद्दिष्ट्ये ठेवण्यात आली, त्याविषयी कोणतेही आकडे ठेवू शकलेले नाही. सर्व अर्थतज्ज्ञांनी सांगितले होते की, अर्थव्यवस्थेला झटका बसेल, तो बसला. मागील दोन दशकांच्या तुलनेत देशाचा जीपीडी नीचांकी पातळीवर गेला आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना मनोज तिवारी म्हणाले, खरे सांगायचे तर ती नोटबंदी नव्हती. नोटाबदल होता. जुन्या नोटा द्या, नव्या नोटा मिळणार अशी ती योजना होती. नोटबंदी हा चुकीचा अर्थ लावण्यात आला. ज्यांच्याकडे चुकीच्या मार्गानं पैसा होता, त्यांच्यासाठी ही समस्या होती. ज्यांच्याकडे योग्य मार्गानं त्यांच्यासाठी रांगेत उभे राहणे हीच अडचण होती. शाहीन बागमध्ये असलेल्या प्रवृत्तीच्या लोकांना नोटबंदीचा त्रास झाला. सरकारच्या सर्व लोक कल्याणकारी योजनांसाठी नोटबंदीचा खूप फायदा झाला, असा दावा तिवारी यांनी केला. 8 फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान होत असून, 11 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीत बाजी मारण्यासाठी भाजपा, आप आणि कॉंग्रेसने जोर लावला आहे. प्रचारात एकमेकांवर आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. केंद्रात सत्तेत असलेली भाजपा, दिल्लीतील सत्ताधारी असलेली आप आणि कॉंग्रेस अशी तिरंगी लढत दिल्लीत बघायला मिळत आहे.