नवी दिल्ली – भारताने करोना लसीकरण मोहिमेत शुक्रवारी आणखी एक महत्वाची कामगिरी केली. त्यानुसार, देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या करोनालसींच्या डोस संख्येने 150 कोटींचा टप्पा पार केला. देशात करोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ मागील वर्षीच्या 16 जानेवारीपासून झाला. त्यानंतर अवघ्या 9 महिन्यांत देशाने 100 कोटी डोस संख्या गाठण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. त्या कामगिरीची नोंद मागील वर्षी 21 ऑक्टोबर या दिवशी झाली.
देशाला डोस संख्येतील 100 ते 150 कोटीपर्यंतचा पल्ला गाठण्यास अवघा अडीच महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळे एकीकडे करोना संकट पुन्हा गडद होऊ लागले असले; तरी दुसरीकडे लसीकरण मोहिमेने वेग घेतल्याचे सूचित होत आहे. देशातील 91 टक्के प्रौढांना (18 वर्षांवरील) आतापर्यंत करोनालसींचा किमान एक डोस मिळाला आहे. तर, 66 टक्के प्रौढांना दोन डोस देण्यात आले आहेत.
सरलेल्या वर्षात फक्त प्रौढांचे लसीकरण करण्यात आले. नववर्षात (3 जानेवारीपासून) 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरणही सुरू झाले. तेव्हापासून आतापर्यंत देशातील संबंधित वयोगटातील 22 टक्के मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. आता 10 जानेवारीपासून देशात बूस्टर (प्रीकॉशन) डोस देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि सहव्याधी असणारे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र असतील.