मनपाच्या कोंडवाडा विभागाचा अनागोंदी कारभार उघड
नगर – महानरगरपालिकेच्या कोंडवाडा विभागाचा अनागोंदी कारभार उजाडात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रेनिमित्त कोंडवाडा विभागामार्फत मोकाट जनावरे पकडण्याची मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेत कर्मचाऱ्यांच्या हजेरी रजिस्टरवर उपस्थिती 29 दिवसाची नोंद करण्यात आली असून, प्रत्यक्ष काम अवघे 6 दिवसच करण्यात आले आहे. शहरात फक्त 40 मोकाट जनावरे पकडली. त्यावर तब्बल 3 लाख रुपये खर्च झाल्याचे समोर आले आहे. या अनागोंदी कारभराची चौकशी करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.
शहरासह उपनगरात मोकाट जनावरांचा तसेच भटक्या कुत्र्यांचा झालेला सुळसुळाट, कचऱ्याचा निर्माण झालेल्या प्रश्नासंदर्भात नगरसेवक गणेश भोसले, संपत बारस्कर, अविनाश घुले, विनित पाऊलबुधे, प्रकाश भागानगरे, सुनिल त्रिंबके, मनोज कोतकर, डॉ.सागर बोरुडे, निखिल वारे, संजय चोपडा, बाळासाहेब पवार, अजय चितळे, मुजाहिद कुरेशी, अजिंक्य बोरकर आदींच्या शिष्टमंडळाने महापालिकेत जाऊन आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची भेट घेतली. या विषयावर चर्चा सुरु असतानाच आयुक्तांनी आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना कोडवाडा विभागाचे हजेरी रजिस्टर व इतर नोंदवह्या घेऊन बोलावले.
या हजेरी रजिस्टरची पाहणी केली असता कोंडवाडा विभागात 12 कंत्राटी कामगार तर 2-3 महापालिकेचे कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा नगरमध्ये आली होती. त्या काळात कोंडवाडा विभागामार्फत मोकाट जनावरे पकडण्याची मोहिम राबविण्यात आली. ही मोहिम 6 दिवस राबवून 40 जनावरे पकडली गेली. त्यावर तब्बल 3 लाख रुपये खर्च झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. हा प्रकार आयुक्तांच्या समोरच उघडकीस आल्याने यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नगरसेवकांनी केली. कोंडवाडा विभागामार्फत 1 जनावरं पकडण्यासाठी तब्बल 7 हजार 500 रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. याबाबत या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले.