नगर – महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने 13 नोव्हेंबरपासून सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीमेत तब्बल एक हजार 500 अतिक्रमणे हटविली आहेत. दरम्यान, आज बालिकाश्रम रस्त्यावरील रहदारीस अडथळा निर्माण होणारे पक्के अतिक्रमण, रस्त्यावरील फलक हटविण्यात आले.
बालिकाश्रम रस्त्यावरील रहदारीस होत असलेल्या अडथळ्याबाबत प्रभातने वृत्तप्रसिद्ध केले होते. वृत्ताची दखल घेत मनपाने कारवाई केली. शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम महापालिकेने बुधवारी (दि.13) माळीवाडा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारापासून सुरू केली होती. गेल्या सात दिवसांपासून ही मोहीम शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू आहे. गुरुवारी (दि.21) रोजी अतिक्रमण विरोधी पथकाने बालिकाश्रम रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली.
शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
याबाबत मनपा प्रशासनाने रस्त्यावरील वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत होती. गेल्या कित्येक वर्षापासून नागरिकांनी बालिकाश्रम रस्त्याच्या कामासाठी महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून, रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आले. परंतु रस्ता होऊनही नागरिकांना जा-ये करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. लक्ष्मीउद्यान न्यु आर्टस महाविद्यालयाच्या पाठीमागे तसेच रस्त्यारस्त्यांवर हातगाड्या, तसेच विविध क्लासेसे असल्याने रस्त्यावच वाहने उभी केली जातात. त्यामुळे ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.
त्यातच दिल्लीगेट ते न्यु आर्ट महाविद्यालय परिसरात रस्त्याचे काम सुरु असल्याने याठिकांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. पोलीस प्रशासनाने ही वाहतूक बालिकाश्रम रस्त्याने वळविली आहे. त्यामुळे बालिकाश्रम रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे मनपा प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली. अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वात राबवण्यात आलेल्या या मोहिमेत एक जेसीबी, दोन ट्रक व अतिक्रमण विभागाचे 30 कर्मचाऱ्यांचा समावेश होता.