– प्राचार्य डॉ. खुशाल मुंडे
करोना महामारीचा फटका जगभरात सर्वच क्षेत्राला बसला असला तरी शिक्षण क्षेत्राला बसलेला फटका अधिक तीव्र स्वरूपाचा आहे. कारण शिक्षणक्षेत्र खिळखिळे होत असल्याचे दृष्टिपथास येत आहे.
शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, असे म्हटले जाते. अर्थात जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्य काही ना काही प्रत्येक क्षणाला शिकत असतो. मग त्या ठिकाणी फक्त पुस्तकी शिक्षणच नव्हे तर मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे लागते ते ते घेण्याचा प्रयत्न करत असतो.पण कसेही असले तरी आपल्या भारतीय शिक्षण प्रणालीत विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक्रम, शाळा, महाविद्यालय हे घटक महत्त्वाचे मानले जातात. या सर्वांच्या परस्पर संबंधातून ज्या घडामोडी घडतात त्यातूनच शिक्षण प्रक्रिया चालते.
गेल्या दीड वर्षापासून करोना महामारीमुळे या तिन्ही घटकांना आपल्या क्रिया-प्रतिक्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या अत्याधुनिक शैक्षणिक साधनांचा वापर करावा लागतो आहे. तो करत असताना भारतातील दारिद्य्र, गरिबी व इतर काही घटकांमुळे अनेक जण शिक्षणापासून वंचित राहताना दिसत आहेत. जवळजवळ 50 टक्के विद्यार्थी सध्या शिक्षणापासून वंचित राहताना दिसून येतात, त्याचे मुख्य कारण म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधेचा अभाव आणि हे सर्व काही घडते आहे ते फक्त करोना महामारीच्या परिस्थितीमुळे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे त्यांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि सामाजिक अंगाने विकास होणे होय. परंतु या विविध क्षेत्रातील मुलांचा विकास या महामारीमुळे थांबलेला दिसून येत आहे. याकडे राज्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण महर्षी योग्य त्या पद्धतीने पाहताना दिसून येत नाहीत.
या महामारीच्या परिस्थितीमुळे विद्यार्थी सामाजिक, शारीरिक, मानसिक, शैक्षणिक दृष्टिकोनातून अविकसित राहतील अशी भीती वाटत आहे. आपण सर्व या परिस्थितीला तोंड देत असताना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. सर्वच विद्यार्थी आपल्या घरांमध्ये नजर कैदेत ठेवल्यासारखे असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत आहे. याचा विचार कोण करणार? एक तर विद्यार्थ्यांना शासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठीची साधने माफक दरात किंवा मोफत दिली पाहिजेत तसेच ग्रामीण भागांपर्यंत तंत्रज्ञानाचे नेटवर्क नेले पाहिजे तरच या गोष्टींचा उपयोग होईल.
शिक्षण प्रक्रियेतील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक होय. या शिक्षकाविषयी बोलताना समाजामध्ये विविध मतप्रवाह निर्माण झालेले आहेत. ते असे की, शिक्षणप्रक्रियेत शासकीय अनुदानित व विनाअनुदानित या प्रकारच्या शाळा, महाविद्यालये कार्यरत आहेत. शासकीय आणि अनुदानित शाळा महाविद्यालयांतील शिक्षकांना मिळणारे वेतन व त्यांच्याकडून होत असलेले शैक्षणिक कामकाज याबद्दलही समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने बोलले जाते. परंतु त्याउलट विनाअनुदानित शाळा महाविद्यालयांतील शिक्षकांच्या कामकाजाविषयी समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून बोलले जाते. परंतु त्यांना मिळणारे वेतन हे तुटपुंजा स्वरूपाचे ना पोटभर खाता येईना अन् उपाशी राहता येईना, अशा परिस्थितीत शिक्षक आणि सर्वच कर्मचारी आपले काम इमानेइतबारे करतात.
महामारीच्या परिस्थितीमध्ये या विनाअनुदानित शाळा महाविद्यालयांतील प्राचार्य, शिक्षक आणि सर्व कर्मचारी यांची परिस्थिती फार बिकट झाल्याचे दिसून येत आहे. वेठबिगार, रोजंदारी कर्मचारी अशी परिस्थिती सध्या जगात आहे. काही संस्थांमध्ये त्यांना पन्नास टक्के वेतन दिले जाते, तर काही संस्थांमध्ये दिले जाते की नाही, हा प्रश्न निर्माण होतो. परंतु विद्यार्थ्यांकडून येणारी फीस जवळ जवळ पूर्णपणे येत असूनसुद्धा शिक्षण महर्षींकडून, शासन राज्यकर्त्यांकडून अशा पद्धतीने महामारीच्या पडद्यामागून पिळवणूक होत आहे, याचासुद्धा विचार होणे गरजेचे आहे. विविध अभ्यासक्रमाच्या बाबतीत बोलताना असे दिसून येते की, प्री प्रायमरीपासून ते विद्यावाचस्पतीच्या शिक्षणाच्या टप्प्यापर्यंत अभ्यासक्रम त्या त्या इयत्तेनुसार बनवलेला असतो. त्याच बरोबर त्याचा कालावधीही ठरवून दिलेला असतो. परंतु या महामारीमुळे प्रत्येक इयत्तेचा अभ्यासक्रम पूर्ण होतो की नाही, ही शंका निर्माण होत आहे. अभ्यासक्रम जरी पूर्ण केला तरी प्रॅक्टिकल प्रत्यक्ष अनुभवासाठी दिले गेलेले असते परंतु त्याबाबत न बोललेलेच बरे. यामधून घडणारा विद्यार्थी येणाऱ्या भविष्यकाळात कशा पद्धतीने टिकेल, यापुढेही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
आपण फक्त शिक्षक, विद्यार्थी यांचाच विचार न करता शाळा प्रशासन यांचाही विचार करावा लागेल. प्रशासनाला शाळा, महाविद्यालय चालवत असताना त्यांना लागणारे आर्थिक बळ हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. परंतु संस्थेच्या ज्या ज्या युनिटमध्ये पूर्ण प्रवेश क्षमतेने होत असतील किंवा पाच दहा टक्के कमी असेल, तर या महामारीच्या कालावधीत सर्व कर्मचाऱ्यांना शिक्षण महर्षींनी सांभाळून घेतले पाहिजे. आपणाकडे दोन वर्षांपासून ते पंधरा वर्षांपर्यंत अनेक कर्मचारी काम करत असतात. त्यांचे काम इमानेइतबारे चालत असते. मग एखाद्या वेळी प्रसंगावधानाने जर हा कर्मचारी संकटात सापडत असेल तर मोठ्या मनाने मोठ्या दिलाने आपण त्यांना ठरवून दिलेले वेतन वेळेवर दिले पाहिजे, असे वाटते.
एकंदरीत विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, प्रशासन आणि शिक्षण महर्षी या सर्वांचा वैचारिक दृष्टिकोनातून सकारात्मक हेतूने समन्वय घडला पाहिजे. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या मनामध्ये शंकाकुशंका निर्माण होण्याची गरज भासणार नाही. करोना परिस्थितीचा कोणीही बाऊ करू नये. या परिस्थितीवर नक्कीच मात करू आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करू. अन्यथा चोहोबाजूने शिक्षण क्षेत्र खिळखिळे व्हायला वेळ लागणार नाही.