इस्लामाबाद – किशोरवयीन हिंदू भगिनींचे झालेले धर्मांतर हे अपहरण करून बळजबरीने झालेले नसून त्यांना त्यांच्या पतीसोबत राहता येऊ शकेल, असा निकाल पाकिस्तानातील न्यायालयाने दिला आहे. यामुळे तेथील हिंदूंच्या भावनांची पायमल्लीच न्यायालयाकडून झाल्याची भावना व्यक्त होते आहे.
रवीना (13 वर्षे) आणि रीना (15 वर्षे) या किशोरवयीन मुली अल्पवयीन आहेत. त्यांचे अपहरण केले गेले आणि धर्मांतर करून मुस्लिम मुलांसोबत निकाह लावला गेला होता, असा पालकांचा आरोप होता. या मुली सिंध प्रांतातील घोटकी येथील हिंदू कुटुंबातील आहेत. त्यावर या मुलींनी आपल्या मर्जीने इस्लाम धर्म स्वीकारल्याने त्यांना आपल्या सोबत राहू द्यावे, अशी भूमिका त्यांच्या पतींनी घेतली होती. या मुली इस्लाममुळे प्रभावित झाल्यानेच त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याचेही न्ययालयात सांगण्यात आले होते.
या प्रकरणातील धर्मांतरामागील तथ्य तपासण्यासाठी मुख्य न्यायाधीशांनी पाच सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाने धर्मांतर बळजबरीने झाले नसल्याचा निष्कर्श दिला.