सातारा – भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये मुस्लिम समाजाचे योगदान अतिशय मोलाचे आहे. हा इतिहास तरुण पिढीपुढे आणणे हे प्रत्येक सजगनागरिकाचे काम आहे, असे मत इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक सरफराज अहमद (सोलापूर) यांनी येथे व्यक्त केले.
स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शहरातील गुरुवार परज येथील नगरपालिकेच्या शाळेच्या हॉलमध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील मुस्लिम समाजाचे योगदान या विषयावर सरफराज अहमद यांचे व्याख्यान झाले.
त्यावेळी ते बोलत होते. येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय मांडके यांचेही यावेळी सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान या विषयावर भाषण झाले. मुस्लिम जागृती अभियान व परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सरफराज अहमद यांनी सोलापूरच्या हुतात्मा कुर्बान यांच्या कर्तुत्वाचा प्रेरणादायी इतिहास उपस्थितांना सांगितला. स्वातंत्र्य चळवळीत सातारा जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनीही अनेक प्रकारे योगदान दिले आहे याची अनेक उदाहरणे देऊन विजय मांडके यांनी आझाद हिंद सेना, भूमिगत स्वातंत्र्यसैनिक, सविनय सत्याग्रह करणारे स्वातंत्र्यसैनिक आणि प्रतिसरकारमध्ये काम करणारे स्वातंत्र्यसैनिक यामध्ये असलेल्या मुस्लिम स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. प्रति सरकारच्या कासेगाव गटाचे उपगटप्रमुख असलेले कॉ. शेख काका यांच्या कार्याची माहिती त्यांनी दिली.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन मिनाज सय्यद यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, डॉ. प्रसन्न दाभोळकर, प्राचार्य डॉ. आतार, कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य करीम शेख, किशोर बेडकीहाळ, जयंत उथळे, डॉ. तांबोळी, ऍड. मिलिंद पवार, दिलीप ससाणे, नंदकुमार चोरगे, गौतम भोसले, शाहीर प्रकाश फरांदे तसेच मुस्लिम जागृती अभियानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.